स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राज्य निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, राज्यातील निर्बंध आजपासून शिथिल होणार आहेत. मॉल, रेस्टॉरंट, दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत आणि खासगी कार्यालयांना २४ तास खुली ठेवण्याची मुभा ठाकरे सरकारने दिली आहे. मात्र, लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचे स्वरूप दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक असण्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाने वर्तविला असल्याने राज्याची ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेऊन ७०० टन ऑक्सिजनची गरज जेव्हा राज्याला भासेल तेव्हा तातडीने राज्यात लॉकडाउन केला जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यात सर्वच जिल्ह्यांमधील निर्बंध सरसकट उठविताना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असणे सक्तीचे करण्यात आले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉलना रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, तेथे जास्तीत जास्त २०० संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीनिशी परवानगी देण्यात आलेली आहे मात्र ही मर्यादा १०० या पेक्षा जास्त असणार नाही.
खासगी आस्थापनांना २५ टक्के उपस्थितीसह २४ तास कार्यालये खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावण्यापेक्षा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना बोलावले जावे, अशी यामागची कल्पना असल्याचे ठाकरे सरकारने स्पष्ट केलं आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उपनगरी गाड्यांबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे १४ दिवस झालेले असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये त्याचे स्वतःचं ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचे प्रमाणपत्र हे जर त्या ठिकाणी दाखविले तर, मासिक आणि त्रैमासिक पासेस देण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत. नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. काही निर्बंध शिथिल केले आहेत. पण, संकट टळले आहे असं आपण म्हणू शकत नाही. जगात काही ठिकाणी पुन्हा कोरोनाने उचल खाल्ली आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोकांनी धोका लक्षात घ्यावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान म्हणाले.
आजपासून काय सुरु होणार?
- दुकानांच्या वेळाही रात्री १० वाजेपर्यंत वाढविल्या
- मॉलमध्ये जाण्यासाठी लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस होणे आवश्यक
- धार्मिक स्थळे, मंदिर आणि प्रार्थनास्थळे बंद
- चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे बंदच
- इनडोअर खेळांसाठी सर्व खेळाडू व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस झाले असतील तरच परवानगी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.