
'महाविकास आघाडी सरकारवरचं संकट लवकर दूर होईल आणि सरकार वाचेल.'
बडव्यांमुळेच 'मातोश्री' बदनाम, त्यांच्यामुळेच शिवसेनेत फूट : देवेंद्र भुयार
Maharashtra Political Crisis : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको. मी राजीनामा देण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील इमोशनल उत्तर दिलंय. शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. त्यांनी यावेळी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा दाखला देत उत्तर दिलंय. काँग्रेससोबत जायचं नाही, हे बाळासाहेबच बोलले होते. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. समविचारी पक्षांसोबत राहायचं ही बाळासाहेबांचे हे मुख्य विचार आहेत, अशी भावनिक साद शिंदे यांनी घातलीय.
हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार; भाजप आमदाराचं सूचक वक्तव्य
दरम्यान, या राजकीय वादात आता अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी उडी घेतलीय. मुख्यमंत्री म्हणजेच 'आमचा विठ्ठल' चांगला आहे. मात्र, त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळं फूट पडलीय. हे बडवे मुख्यमंत्र्यांना कोणाशी भेटू देत नाहीत, कामे होऊ देत नाहीत, असं म्हणत विदर्भातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील (Morshi Assembly Constituency) अपक्ष आमदार भुयार यांनी मुख्यमंत्र्यांचे सहायक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावर निशाणा साधलाय.
हेही वाचा: 'सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाहीय, हे सरकार पडायलाच हवं'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अवतीभवतीचे वातावरण आणि माणसं लवकरात-लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे. मात्र, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्यांना घेरलंय. त्या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत आहे. जे आमदार नाराज होऊन गेले आहेत ते याच बडव्यांमुळं नाराज होऊन गेले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही. त्यामागचं प्रमुख कारण हे बडवे आहेत, अशी टीकाही आमदार भुयार यांनी केलीय. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवरचे संकट लवकर दूर होईल आणि सरकार वाचेल. शिवसेनेतील बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसांत परत येतील, असा विश्वासही भुयार यांनी व्यक्त केलाय.
Web Title: Maharashtra Political Crisis Mla Devendra Bhuyar Criticizes Milind Narvekar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..