
Maharashtra Rain: राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसानं आता सर्वत्र जोरदार कमबॅक केलं आहे. मुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे आणि कोकण भागात जोरदार पाऊस सुरु आहे. आजच्या दिवसातील पावसाचा आढावा.
पुणे शहरात 10 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर सकाळी मुंढवा जॅकवेल पुलावरून पाणी वाहत असल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीस हा पूल बंद केला होता. आणि शहरात दोन ठिकाणी किरकोळ स्वरूपात शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. शहरात ठिकठिकानी सखल भागात पाणी साचले आहे.
सकाळी ते सांयकाळी वाजेपर्यंत म्हणजेच नऊ तासात तब्बल 103.11 मीमी विक्रमी पावसाची नोंद ठाण्यात झाली.
ठाण्यामध्ये तर या वर्षातल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत ठाण्यामध्ये 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुण्यातील एकतानगरी विठ्ठलवाडी परिसरातील शारदा सरोवर जलपूजन सोसायटीच्या रस्त्यावर असे पाणी जमा झाले आहे.
सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातून 1100 क्युसेक व डावा कालवा विद्युतगृहातून 900 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज सायंकाळी 5 वाजता 32459 क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून 41733 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नीरा नदीपात्रात एकूण 43733 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
सातारा : कोयना-महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. सध्या कोयना धरणातून 42 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं कोयनेकाठी अलर्ट देण्यात आला आहे. साताऱ्याच्या काही भागात पावसाची संततधार सुरुच आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गाच्या वाकड चौक ते भूमकर चौकमधील सर्व्हिस रोड हा एक व्यस्त मार्ग आहे. जोरदार पाऊस झाल्यावर हिंजवडीकडून डावा टर्न घेऊन पुढं सर्व्हिस रोड वरून जाताना पाण्याचे तळे साचते. यातून मार्ग काढताना जास्त हाल होत आहेत.
ठाण्यात पावसामुळं वाहतूक संथ गतीनं सुरु असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरही कोंडी पहायला मिळत आहे. पूर्व द्रुतगती मार्गही जाम झाल्याचे सध्या चित्र आहे.
उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातून जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता आज दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता उरमोडी धरणाचे वक्रद्वारातून 2879 क्युसेक विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नदीपात्रात सांडवा 5787 क्युसेक व विद्युत गृह 500 क्युसेक असा एकूण 6287 क्युसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू असणार आहे, असं उरमोडी धरण प्रशासनानं सांगितलं आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा २२,८८० क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी १ वा. ३०,६७७ क्यूसेक करण्यात येत आहे. यंदाच्या मोसमातील सर्वात जास्त विसर्ग खडकवासला धरणातून ३० हजार ६७७ क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. यापूर्वी ११ ऑगस्ट २०२२ रोजी २६ हजार ८०९ क्युसेक विसर्ग सोडला होता.
मुंबई : मुंबई, उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवांचा वेग मंदावलेला असून लोकलचा वेळापत्रकावर परिणाम झाला. दरम्यान, सकाळीपासून तिन्ही मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळं कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना आज लेट मार्क लागलेला आहे. गुरुवारी रात्रीपासून मुंबई शहरासह उपनगराला अक्षरश: पावसानं झोडपून काढलं. गुरुवारी रात्रभर आणि आज सकाळीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं सर्वाधिक फटका मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बसला आहे. सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा ते कल्याण या विभागता जोर पाऊस सुरू आहे. त्यामुळं काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा वेग मंदावलेला आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरण (Ujani Dam) ओव्हरफ्लो झालं आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरण (Veer Dam) देखील पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सध्या या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. उजनी धरणातून 70 हजार क्यूसेकने तर वीर धरणातून 15 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळं अनेक ठिकाणी सखलभागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. शिवाय, ढगाळ वातावरणामुळं पूर्णतः काळोख झाला असल्यामुळं दृश्य मानता देखील कमी झाली आहे, यामुळं रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालक वाहन जपून चालवत असून पश्चिम उपरागरातून मुंबई शहराकडे येणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी गोरेगाव अंधेरी विलेपार्ले सांताक्रुज या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई विरार, नवी मुंबई आणि लगतच्या उपनगरांत सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून लोकलसेवा सुरु असली तरी धिम्या गतीनं सुरु आहे.
पुणे शहर परिसरात पडणारा पाऊस पाहता नागरिकांनी काळजी घेत नदी, नाले, ओढे तसेच नदीपात्रात प्रवास टाळावा. नदीपात्रात असलेली वाहने हलविण्यात यावीत, तसेच जनावरांची देखील काळजी घ्यावी. येत्या काही तासांत पावसाचं प्रमाण पाहता धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सर्वांनी खबरदारी बाळगावी - अग्निशमन दल, पुणे
मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळं वाहनांची गती मंदावली आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे. उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत असली तरी खबरदारी म्हणून गाड्या धीम्या गतीनं चालवण्यात येत आहे.
नंदूरबार जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी अति पवसामुळं पिकांचं नुकसानही झालं आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ होत आहे. येत्या ३ ते ४ तासांमध्ये खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे २२,००० ते २५,००० क्युसेक विसर्ग सोडला जाण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असं आवाहन सहाय्यक अभियंता यो. स. भंडलकर यांनी केलं आहे.
लोणावळ्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात लोणावळ्यात ११८ मिमी पावसाची नोंद झालीय. यंदाच्या मोसमात लोणावळ्यात ५ हजार ५१२ मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ४ हजार २७२ मिमी पाऊस झाला होता.
सातारा : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain In Satara) पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 104.71 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 29 हजार 24 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल गुरूवारी रात्री 11 वाजता धरणातून 27 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला होता. आता यामध्ये वाढ करून आज शुक्रवारी 41 हजार 958 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळं कोयना व कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. तेव्हा नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनानं (Koyna Dam Management) दिला आहे. गेल्या तीन दिवसांत चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
पुणे : हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टी अधिक तीव्र होत आहे. त्यामुळं अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहे. त्यात गुजरातमधील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडं सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून पुण्या-मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.