‘एक्साईज’ला हातभट्टी सापडते, पोलिसांना का नाही? हातभट्टीचे तांडे, दारू विक्रीची गावे माहिती असूनही कानाडोळा

‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत सुरवातीला हातभट्टी निर्मितीचे तांडे आणि अवैध जीवघेणी हातभट्टी विक्री होणाऱ्या गावांची यादी तयार करण्यात आली होती. पण, आता ती यादी सध्या कागदावरच असून ना दत्तक अधिकारी नेमले ना कारवाई होतेय.
solapur
solapursakal

सोलापूर : ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत सुरवातीला हातभट्टी निर्मितीचे तांडे आणि अवैध जीवघेणी हातभट्टी विक्री होणाऱ्या गावांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार, प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला ती गावे दत्तक दिली होती. त्याप्रमाणे आठवड्यातून तीनवेळा संबंधित ठिकाणी छापे टाकले जायचे. पण, आता ती यादी सध्या कागदावरच असून ना दत्तक अधिकारी नेमले ना कारवाई होतेय, अशी वस्तुस्थिती आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्ह्यात सोलापूर ‘अ’ आणि ‘ब’ पंढरपूर व माळशिरस असे चार विभाग आहेत. एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन जवान, एक चालक अशी प्रत्येक विभागाची टीम आहे. जिल्ह्यासाठी एक भरारी पथक आहे. एकूणच संपूर्ण जिल्ह्यासाठी अंदाजे ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या या विभागाने मागील आठ महिन्यात धडाकेबाज कारवाई केली आहे.

दुसरीकडे जिल्हाभर ग्रामीण पोलिसांची २५ पोलिस ठाणी आणि साडेचार हजारांहून अधिक मनुष्यबळ असतानाही अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व अवैध वाहतूक होतेच कशी, हा संशोधनाचा विषय बनला आहे. राजरोसपणे गावागावात हातभट्टी दारूची विक्री होते, गावातील भांडणे पोलिस ठाण्याला जातात.

दारू पिऊन हाणामारी, शिवीगाळ किंवा अन्य गुन्हा केल्याचे फिर्यादीत नमूद असते. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल होतो, पण दारू आणली कोठून आणि कोणाकडे पिला याच्या मुळाशी पोलिस कधी जात नाहीत. त्यातूनच अवैध व्यवसायाला पाठबळ कोणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारवाईसंबंधी पोलिसांचे ‘एक्साईज’कडे बोट

अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वतंत्र आहे. पण, सरकारचा महसूल बुडवून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर व विक्रीवर ते प्रामुख्याने कारवाई करतात. तरीदेखील हातभट्ट्यांवर छापे, हातभट्टी विक्रेत्यांवर, ढाब्यांवर देखील त्यांच्या कारवाया सतत सुरू आहेत. ग्रामीण पोलिसांकडूनही कारवाया होतात. मात्र, ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत ज्या गोष्टी प्रभावीपणे व्हायला हव्या, त्या होत नाहीत. अनेकदा पोलिसांकडून ऐकायला मिळते, दारू पकडणे व विक्रेत्यांवरील कारवाई, आमचे काम नसून त्यासाठी ‘एक्साईज’ विभाग स्वतंत्र आहे. पण, येथे अधिकार कोणाचा, यापेक्षाही गावातील शांतता-सुव्यवस्था राखणे व तरुणांना व्यसनापासून रोखणे, ही बांधिलकी महत्त्वाची आहे.

‘एक्साईज’कडून ६६३ गुन्हे दाखल,४१५ जणांना अटक

पदभार घेताना पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, ‘ऑपरेशन परिवर्तन’ मोहीम खूप महत्त्वाची असून ती तशीच अधिक जोमाने सुरु राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’चा पुरस्कारही स्वीकारला. त्यावेळी गावागावातील नवविवाहित तरुणी, ज्यांचे पती दारूच्या आहारी गेले, त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पण, त्या अपेक्षा अपूर्णच राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून १ नोव्हेंबर २०२२ ते ३० जून २०२३ या आठ महिन्यात एक्साईज विभागाने जिल्ह्यातून दोन कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ४१५ जणांना अटक करून जवळपास ६६३ गुन्हे दाखल केले. या तुलनेत निश्चितपणे ग्रामीण पोलिसांची आकडेवारी कमी असल्याचा बोलबाला खुद्द पोलिस दलामध्येच आहे, हे विशेष.

‘एक्साईज’ची आठ महिन्याची कारवाई

  • हातभट्टीचे निर्मितीचे गुन्हे

  • ३२९

  • हातभट्टी विक्री

  • २४०

  • हातभट्टी वाहतूक

  • ९४

  • एकूण मुद्देमाल जप्त

  • २.५१ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com