Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे

उस्मानाबाद - महायुतीच्या प्रचार सभेवेळी सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत उमेदवार.
उस्मानाबाद - महायुतीच्या प्रचार सभेवेळी सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत उमेदवार.

विधानसभा 2019 : उस्मानाबाद/परंडा - महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे ते परंड्यातील सभेत म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभांत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले की, वीस वर्षांनंतर अजित पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याची चूक कळते. मग सुडाचे राजकारण कोणी केले, याचा विचार जनतेने करावा. ज्यांच्या सत्तेच्या काळात जातीय दंगली पेटल्या तेव्हा तुम्ही काहीही केले नव्हते. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य जनतेसाठी पुढाकार घेतला. ते प्रकरण दहा वर्षांनंतर काढून शरद पवार यांच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती. तेव्हा ते सुडाचे राजकारण नव्हते का, आता तुम्हाला तुम्ही केलेल्या गैरव्यवहारामुळे कारवाईची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच पवार हे सरकारवर सुडाचे राजकारण करीत असल्याची टीका करीत असल्याचे सांगत, चांगल्या कामात शिवसेनेचा कायम पुढाकार आहे. भाजपला पाठिंबा दिल्यामुळेच राज्याला सक्षम सरकार मिळाल्याचे ठाकरे म्हणाले. यापुढेही महायुतीचे सरकार येणार असून, जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दहा रुपयांत जेवण देण्यात काय गैर आहे? आम्ही सामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार करतो. स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांना हे चुकीचे वाटणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

शरद पवार यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केली असती, तर राज्याचे हाल झाले नसते. पवार अनेक वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकारणाची सुरवात वसंतदादांचे सरकार पाडून झाली. त्यामुळे त्यांना सरकार पाडण्याचा अनुभव असल्याची टीका ठाकरे यांनी केली. प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसत असले; तरी पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा वाटा आहे. सरकारमध्ये असलो तरी चुकीचे वाटल्यास बोलतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘निवडणूक म्हणजे बतावणी नव्हे’
प्रचार सभांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हातवारे करीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. दोघांतील जुगलबंदीचा थेट उल्लेख न करता ठाकरे यांनी, ‘निवडणूक म्हणजे तमाशातली बतावणी नव्हे,’ अशा शब्दांत संदेश देण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com