कोरोना रुग्णांसाठी खुषखबर! महात्मा फुले जनआरोग्य योजनेला मिळणार "या' महिन्यापर्यंत मुदतवाढ

Mahatma Phule
Mahatma Phule

सोलापूर : राज्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वच कोरोनाबाधित रुग्णांसाठी ही योजना लागू केली. परंतु, सरकारच्या या निर्णयाची मुदत आता 31 जुलैला संपणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे या निर्णयास 30 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सरकारला पाठविला आहे. मात्र, त्यावर अद्याप सरकारने काहीच निर्णय घेतलेला नाही. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाउन केला. त्यामुळे राज्यातील बहुतांश लहान-मोठे उद्योग बंद राहिल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले. अशा परिस्थितीत त्यांना उपचाराचा खर्च परवडणार नसल्याने राज्य सरकारने सर्वच कोरोनाबाधित रुग्णांना जनआरोग्य योजनेतून उपचार देण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील एक हजार खासगी व सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. तरीही सद्य:स्थितीत राज्यातील अंदाजित 300 रुग्णालयांमध्येच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयांमध्ये योजनेअंतर्गत बेडची संख्या मोजकीच असल्याने लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोव्हिड केअर सेंटर व होम आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे. योजनेतील रुग्णालयांत वाढ करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांना देण्यात आला. तरीही रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयांत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांकडून ज्यादा बिलाची आकारणी होते, बेड उपलब्ध असतानाही नसल्याचे सांगितले जाते, अशाही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पूर्वीच्या निर्णयाला ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ द्यावी आणि योजनेतील रुग्णालये वाढवावीत, अशा मागण्या होऊ लागल्या आहेत. 

ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव 
याबाबत जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य सरकारने सर्वच रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची मुदत 31 जुलैला संपणार असल्याने आता त्यास 30 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. जनआरोग्य योजनेतून 70 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांवर राज्यातील सुमारे 300 रुग्णालयांमधून मोफत उपचार करण्यात आले आहेत. ज्यादा बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जात आहे. 

"जनआरोग्य' योजनेची स्थिती 

  • एकूण रुग्णालये : 1,000 
  • कोरोनाबाधितांसाठी रुग्णालयांची सोय : 300 
  • "जनआरोग्य'ध्ये कोरोनासंबंधी आजार : 20 
  • उपचारासाठी अर्थसहाय : 25 ते 75,000 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com