Mahavikas Aghadi : ‘वंचित’च्या अटी, शर्तींनी आघाडी हैराण; प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावावर एकमत नाही

महाविकास आघाडीत उशिराने प्रवेश केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अटी आणि शर्तींनी आघाडीचे नेते हैराण झाले आहेत.
prakash ambedkar
prakash ambedkar esakal

मुंबई - महाविकास आघाडीत उशिराने प्रवेश केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अटी आणि शर्तींनी आघाडीचे नेते हैराण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना आघाडीसोबत ‘वंचित’ची गाडी आजही रुळावर आली नाही. ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या जागांच्या फॉर्म्युल्यावर बुधवारच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. आता नवीन प्रस्ताव आंबेडकरांकडून येणार असून नऊ मार्चला होणाऱ्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून ‘वंचित’सोबतचा तिढा प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सुटेल. त्यानंतरच आघाडीचे जागावाटप अंतिम होईल, असा दावा आघाडीकडून आधी करण्यात आला होता. मात्र वरळीतील फोर सीझन हॉटेल येथे पार पडलेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत वंचितच्या मागणीवर कोणताच तोडगा न निघाल्याने बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत. दुपारी एकच्या सुमारास ही बैठक सुरु झाली. त्यापूर्वी सर्व नेत्यांनी एकत्र जेवण केले.

साधारण तीन तासांपेक्षा अधिक वेळ ही बैठक चालली. बैठक संपवून प्रकाश आंबेडकर सर्वप्रथम बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक थोडा वेळ चालली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यात बैठक झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर ढोबळ चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, महाविकास आघाडीने वंचितसोबत आली नाही तर पर्यायी ‘बी प्लान’ देखील आखला आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले जागावाटप निश्चित केल्याचे समजते. यामध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाला सर्वाधिक २२, त्यापाठोपाठ काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) १० जागा लढविणार आहे. त्यामुळे आंबेडकर सोबत आले तर काय आणि न आल्यास काय करता येईल, याची चाचपणी या बैठकीत करण्यात आली.

सकारात्मक चर्चा

बैठकीबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘चार पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. ४८ जागांवर चर्चा झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकाही जागेवर मतभेद नाहीत. आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबतही चर्चा झाली. त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. हुकूमशाही मोडून काढण्यासाठी एकत्र लढावे, ही सर्वांचीच इच्छा असल्याचे राऊत म्हणाले.

१५ ओबीसी, तीन अल्पसंख्याक उमेदवार द्याः वंचितची मागणी

बैठकीत नवीन विषय मांडण्यात आले. मात्र त्यावर बैठकीत चर्चा झाली नाही. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाबाबत आघाडीची नेमकी भूमिका काय आहे, त्यावरही चर्चा झाली नाही. १५ ओबीसी उमेदवार द्यायला हवेत. तीन उमेदवार हे अल्पसंख्याक समुदायाचे असावेत, ही भूमिका मांडली, मात्र त्यावर चर्चा झाली नाही.

निवडणुकीआधी किंवा नंतर भाजपसोबत समझोता करणार नाही, याचे लेखी आश्वासन देण्यावरही सर्व पक्षांनी मौन धारण केल्याचे ‘वंचित’चे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. अकोल्याची जागा द्यायला तयार आहोत, पण तोडगा काढा आपण पुढे जाऊ. मात्र त्यावरही चर्चा झाली नाही. त्यामुळे हे सर्व मुद्दे आणि जागांसंदर्भात पुन्हा वेळ मागून घेतलेली आहे. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. कदाचित पुढच्या बैठकीत काहीतरी नवीन घडेल, अशी अपेक्षा असल्याचे मोकळे यांनी सांगितले.

राजकीय आघाडीवर

  • दिल्लीत भाजपच्या कोअर समितीची बैठक

  • श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसाठी संभाजीराजेंची माघार

  • अजित पवार गटास हव्या शिंदे गटा एवढ्या जागा

  • सोलापुरात प्रणिती शिंदेंना मराठा आंदोलकांचा विरोध

  • बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर पुन्हा टीका

वंचित १५ वरून पाचवर

वंचितने २७ जागांचा आढावा मविआला पाठविला होता. मात्र ही त्यांची ही मागणी मान्य नसल्याचे आघाडीने म्हटले आहे. बैठकीला येण्याआधी ‘वंचित’कडून १५ जागांची मागणी करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात बैठकीत त्यांचा सूर नरमाईचा असल्याचे समजते. त्यामुळे पाच जागांपर्यंत बोलणी आली. मात्र आघाडी तीन जागा देण्यास तयार असल्याचे समजते. त्यातील दोन जागा या ठाकरे गटाच्या कोट्यातून देण्याचे ठरले असले तरी उर्वरित जागा कोण सोडणार हे ठरलेले नाही.

मी अजूनही कशात नाही - आंबेडकर

प्रकाश आंबेडकर बैठकीतून बाहेर पडल्यानंतर जागावाटपाबाबत काय ठरले, असा सवाल पत्रकारांनी केला असता ‘सध्या मी काहीही बोलणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. मविआसोबत एकत्र लढणार का, या प्रश्नावर ‘मी अजून कशात नाही. पुढच्या बैठकीमध्ये ठरेल’, असे ते म्हणाले. तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नावर ‘तुम्हाला चेहऱ्यावरून काय वाटतं,’ असा प्रतिप्रश्न करून आंबेडकर हसत निघून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com