संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण 

Sambhaji-and-jayant
Sambhaji-and-jayant

मुंबई - आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. ज्यांनी जाणीवपूर्वक गुन्हा केला आहे अशांना सहानुभूती दाखवणार नाही. कोरेगाव-भीमाच्या प्रकरणात संभाजी भिडेंना सहानुभूती दाखविण्याचा कोणताही प्रयत्न नाही, असं आज, राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील आरे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलन, धनगर आरक्षण आंदोलन यासह कोरगाव-भिमा प्रकरणातील गुन्हेही मागे घेण्याची मागणी झाली आहे. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, या संदर्भातील सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. तथापि, कोणत्या गुन्ह्यांत कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक गुंतवले गेले आहे, याची नीट माहिती घेऊन सरकार निर्णय घेईल. दंगल घडवण्याचा हेतू नसणाऱ्यांचे गुन्हे मागे घेण्याबद्दल विचार केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. 

प्रकल्प बंद करणार नाही 
आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही. परंतु, काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल, असं मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कालच्या बैठकीत सरकारने विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला. या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याची माहिती जनतेला देणार असल्याचे सांगितले. 'आधीच्या सरकारने राज्यातील काही प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करावेच लागतील. परंतु, आघाडीचे सरकार त्या प्रकल्पांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल यावर भर देईल,' असे त्यांनी स्पष्ट केलं.

'कर्जमाफीवर अद्याप निर्णय नाही'
सरकारचा शपथविधी झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे कर्जमाफीच्या निर्णयाकडं लागले आहेत. पण, त्याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. पाटील म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही सविस्तर माहिती घेत आहोत. शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही अशी आमची वृत्ती नाही. आम्ही योग्यवेळी योग्य ते निर्णय घेऊ. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार समान धोरण राबवेल. पक्ष पाहून निर्णय घेणार नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com