मुंबई - मतदानाला बाहेर न पडणारे लोकव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करतात, हा प्रकार अयोग्य आहे. त्यामुळे मतदान सक्तीचे करण्याबाबत विचार व्हायला हवा. त्याची सुरवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून करावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 3) येथे व्यक्त केले.
73 व्या घटनादुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त घेतलेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे या वेळी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जेमतेम 44 टक्के मतदान झाले. मतदानाला बाहेर न पडणारे नागरिक सुविधांबद्दल नाराजी व्यक्त करतात, हे योग्य नाही. त्यामुळे निदान स्थानिक पातळीवर मतदान सक्तीचे करण्याचा विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात यंत्रणा उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गुजरातमध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणे सक्तीचे करण्यात आले आहे. गोखले अर्थशास्त्र संस्था आणि मुंबई विद्यापीठ, तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात राज्यातील निवडक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
|