मुंबई - ऐन शालेय कामकाजाच्या वेळी शिक्षकांवर लादलेल्या निवडणुकीच्या कामकाजाला आता पूर्णविराम मिळाला आहे. मतदान नोंदणीची तपासणी तसेच "बूथ लेव्हल ऑफिसर'च्या (बीएलओ) कामातून सुटका होणार असल्याची माहिती मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक भारती या शिक्षक संघटनेला दिली. शुक्रवारी सायंकाळी आमदार कपिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शिक्षकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
निवडणुकीच्या काळात मतदार याद्या, छायाचित्र तपासणी आणि "बीएलओ' म्हणून नेमणूक आदी कामांमुळे शिक्षक कमालीचे हैराण आहेत. या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना शाळेत फारसा वेळ देता येत नाही. याचा परिणाम शाळेच्या कामांवर होतो, अशी माहिती आमदार कपिल पाटील यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिह कुशवाह आणि मुंबई शहर उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांना दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी निवडणूक अधिकारी राजा ठाकूर यांना बोलावून शिक्षकांना "बीएलओ'चे काम देऊ नये, अशी सूचना दिली.
"बीएलओ' म्हणून नेमणूक झालेल्या शिक्षकांची तातडीने मुक्तता करा, असा आदेश सोमाणी यांनी दिला. "बीएलओ'चे काम नाकारल्याप्रकरणी राज्यातील अनेक शिक्षकांवरील तक्रारी मागे घेतल्या जाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी केली.
शिक्षणमंत्र्यांच्या दारी...
बीएलओचे काम शिक्षकांना दिले जाऊ नये यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांची भेट घेतली. अशैक्षणिक कामापासून शिक्षकांना दूर ठेवले जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.
|