नागपूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते ७५ हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मोदींनी केलं. यानंतर झालेल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
पंतप्रधान म्हणाले की, मागील आठ वर्षांमध्ये सर्वांची साथ आणि सर्वांचा विकास; या ध्येयाने केंद्र सरकार काम करीत आहे. विकासाच्या बाबतीत जे मागे राहिले त्यांना पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. देशामध्ये शंभरपेक्षा अधिक जिल्हे असे आहेत जिथे मुलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. यामध्ये आदिवासी भाग, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचाः सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
मोदी पुढे म्हणाले की, ज्यांना देश लुटायचा आहे ते देश घडवू शकत नाहीत. शॉर्टकट नीतीचा अवलंब करणारे देशाचे शत्रू आहेत. इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांनी कधीच शॉर्टकटचा मार्ग निवडला नाही. त्यांनी आर्थिक धोरणं योग्य रितीने राबवले, इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला. त्यामुळे ते जगाच्या अर्थनीतीचे केंद्र बनले.
''भारत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अद्योगिक क्रांतीमध्ये मागे राहिला. मात्र आता आपल्याला संधी आहे ती दवडायची नाही. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारताला उंची गाठायची आहे. त्यासाठीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर देशात काम सुरु आहे.'' असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.