येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी होणार पाऊस

Names of Cities in Maharashtra that might witness rain today
Names of Cities in Maharashtra that might witness rain today

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहे. अरबी समुद्रातील वादळ हे येमेनच्या दिशेने सरकत आहे. त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील काही भागांवर आहे. या वादळामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आंबा, काजू पिकांचे नुकसान होण्याच्या शक्यतेने आंबा व काजू बागायतदार धास्तावले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला होता. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाण ढगाळ वातावरण होत आहे. पहिले चक्रीवादळ येमेनच्या दिशेने सरकत नाही, तोच सोमवारी पुन्हा अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. मंगळवारी (ता.३) त्याचे रूपांतर वादळामध्ये झाले आहे. यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली भागात जोरदार वारे वाहत आहे. हे वारे ताशी ६० ते ७० किमी वेगाने वाहत आहेत.दोन दिवसात चक्रीवादळ वायव्येच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्याचा थेट फटका कोकण किनार पट्टीला बसणार नाही; मात्र, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

वादळामुळे कोकणात मंगळवारी (ता.३) रात्री वेगवान वारे वाहत होते. समुद्र खवळल्याने मच्छिमार भयभीत झाले होते. बुधवारी सकाळी एकही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली नाही. ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजूवर परिणाम होणार आहे. त्यातच थंडी लांबल्यामुळे आंबा, काजू हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग भागात सोमवारपासून हलक्या सरींमुळे तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूरसह काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे भात झोडणीचे काम सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे झोडलेला भात आणि पेंढा सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तेथील शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती. 

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ 
ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी कमी झाली असून किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. बुधवारी (ता.४) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नगर, महाबळेश्वर व विदर्भातील गोंदिया येथे १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाडा व विदर्भात किंचित थंडी असून पहाटे हवेत गारठा जाणवत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी अधिक स्वरूपात असून किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com