'...तोपर्यंत कोणी मायचा लाल सरकार पाडू शकणार नाही'

Ajit Pawar
Ajit PawarFile Photo

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सरकार पाडण्याबाबतच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्रवारी चांगलाच समाचार घेतला. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडताना खिल्लीही उडवली. 'कितीदा सांगायचं तीन नेते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही', अशा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले. पुण्यात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याही वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर -

लोक झोपेत असताना सरकार कोसळेल, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते. त्यावर महाविकास आघाडीचे तीन वरिष्ठ नेते एकत्रित आहेत, तोपर्यंत कोणी मायचा लाल सरकार पाडू शकणार नाही,’ असे पवार यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, ‘अजित पवार यांनी माझ्या नादी लागू नये, असे पाटील म्हणाले होते. त्यामुळे कशाला त्यांच्या नादी लागायचे? हे रात्रीतून सरकार पाडतील, यामुळे मी सारखा झोपेतून जागा होतो,’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

ठाकरे सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडताना केले होते.

राणेंना हे समजत नाही का?

ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? आता त्यांनी मराठा समाजासोबत राहून आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, असे वक्तव्य भाजपचे नेते नारायण राणे यांनी केले होते. त्यावर पवार म्हणाले, ‘मग राणे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय का घेतला नाही? इतर वेळी शरद पवार आमचे नेते आहेत, म्हणून वाकून दर्शन घ्यायचे. नंतर वेगळे वक्तव्य करायचे. पवार यांनी सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे.’

Ajit Pawar
मोदींना आठवण करून द्या; अजित पवार यांची आठवलेंना विनंती

आषाढी वारीचा निर्णय घेण्यासाठी समिती

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीला परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचा समावेश आहे. ५० लोकांच्या उपस्थितीत वारीला परवानगी द्यावी, अशी वारकऱ्यांची मागणी आहे. याबाबत वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात येइल. त्यानंतर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील,’ असे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com