

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला आहे. अकोल्यात आज दिवसभरातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान, दुसऱ्या बाजूला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसत आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित राज्यातही विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे.