गर्भवती मातांनी घ्यावी काळजी! सोलापूर जिल्ह्यात ७१७ बाल अन्‌ उपजत मृत्यू; १० माताही दगावल्या, कारण...

जिल्ह्यात १ एप्रिल ते ३१ मार्च २०२३ या काळात तब्बल ५१९ बालकांचा तर १९८ उपजतच बाळाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दहा मातांनी प्रसुतीवेळी किंवा प्रसुतीनंतर जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे. आता माता, बाल व उपजत मृत्यू रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे.
Risk of pregnant mothers
Risk of pregnant motherssakal

सोलापूर : जिल्ह्यात १ एप्रिल ते ३१ मार्च २०२३ या काळात तब्बल ५१९ बालकांचा तर १९८ उपजतच बाळाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दहा मातांनी प्रसुतीवेळी किंवा प्रसुतीनंतर जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे. आता माता, बाल व उपजत मृत्यू रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम घेतला. उसतोडीसाठी आलेल्या टोळ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. गर्भवती महिला स्वत: किंवा तिच्या कुटुंबियांकडून त्या काळात व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. त्यामुळे उसतोड महिलांच्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण यंदा अधिक राहिले आहे. दरम्यान, इतरही महिलांच्या बालकांचा व प्रसुतीवेळीच अनेक बालकांचा देखील मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे.

दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात सरासरी ५४ ते ६० हजार बालकांचा जन्म होतो. पण, कमी दिवसाचे व कमी वजनाच्या बालकांचा काही दिवसांनी मृत्यू होतो. दुसरीकडे प्रसुती काळातील निष्काळजीपणामुळे उपजत मृत्यू होत आहेत. हे प्रमाण रोखण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशासेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्वे केला जाणार आहे.

अतिजोखमीच्या मातांची यादी तयार करून त्यांची दरमहा विचारपूस केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात चार हजार ९६० तशा माता असून त्यांची आता दरमहा आवश्यक तपासणी केली जात आहे. रक्त कमी असलेल्यांना रक्तवाढीच्या गोळ्या व इंजेक्शन दिले जाते. तरीपण, रक्त कमीच असल्यास ६.५ पेक्षा कमी ‘एचबी’ असलेल्यांना मोफत रक्त चढविण्याची देखील सोय ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहे. सिजिरियनची मोफत सोय देखील त्याठिकाणी आहे. पण, संबंधित महिलांनी नोंदणी करून वेळोवेळी तपासणी करून घेणे अपेक्षित आहे.

गर्भवती मातांनी अशी घ्यावी काळजी

  • - तीन महिन्याची गरोदर असतानाच आरोग्य विभागाकडे करावी नोंदणी

  • - वेळेला जेवण अन्‌ दुपारी विश्रांती व पुरेशी झोप घ्यायला हवी

  • - मोड आलेले कडधान्य, शेंगालाडू, खजूर, काळे मणुके, हिरव्या पालेभाज्या खाव्यात

  • - जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे; जास्त मिठाचे जेवण तथा पदार्थ आहारात नकोच

  • - रक्तदाब व मधुमेह असलेल्या प्रसुत महिलांनी वेळोवेळी उपचार घ्यावेत

पहिल्या प्रसुतीवेळी ५ हजार रुपये मिळतात

आरोग्य विभागाकडे नोंदणी केलेल्या महिलांना प्रसुतीवेळी पहिल्या बालकासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जातात. एससी, एसटी व दारिद्रय रेषेखालील महिलांना त्याशिवाय ६०० रुपये स्वत्रंपणे मिळतात. दरम्यान, रक्तक्षय, उच्च रक्तदाब व अतिजोखमेच्या मातांनी स्वत: व तिच्या कुटुंबियांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही, त्यामुळे मातामृत्यू झाले. दुसरीकडे कमी दिवस व कमी वजनामुळे आणि निमोनियामुळे बालमृत्यू होत असल्याची कारणे समोर आली आहेत. आता त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com