कोरोनाची लस कधी येणार..? महसूलमंत्री थोरात म्हणाले, डब्ल्यूएचओला सांगता येईना मग मी कसं सांगू? 

balasaheb thorat
balasaheb thorat

सोलापूर : ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांची कारणे शोधली असता लग्न, वाढदिवस, अंत्यविधी यासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहिल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण अधिक वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासन व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही कोरोनाच्या बाबतीत आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. कोरोनाची लस कधी येणार, या प्रश्‍नावर मंत्री थोरात म्हणाले, डब्ल्यूएचओला सांगता येईना मग मी कसं सांगू? 

सुरवातीला मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये असलेला कोरोना नंतरच्या कालावधीत जिल्ह्याच्या ठिकाणी पोचला. मुंबई व सोलापूरसह राज्यातील मोठ्या शहरांमधील कोरोना आटोक्‍यात येत आहे. तालुका व गाव पातळीवर मात्र कोरोना वाढू लागला आहे. कोरोनावर सुरू असलेल्या लसीसंदर्भात विविध प्रसार माध्यमांतून बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर माहिती व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या हाती ही लस कधी मिळणार आणि किती रुपयांना मिळणार, या प्रश्नाचे ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही. सोलापुरातील कोरोना स्थिती व उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री डॉ. यशोमती ठाकूर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देण्यासाठी या तिन्ही मंत्र्यांची पत्रकार परिषद आज सात रस्ता येथील नियोजन भवनात झाली. कोरोनावरची लस प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार? राज्य सरकारची काय तयारी आहे? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर महसूलमंत्री श्री. थोरात यांनी हे उत्तर दिले. 

कोरोनाला हरवण्यासाठी किंवा कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही जर लसीची वाट पाहात असाल तर तूर्तास तरी आपल्या हातात लस मिळणार नसल्याचे महसूलमंत्री थोरात यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर या तालुक्‍यांत कोरोना बाधितांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाची परिस्थिती, कारणे याबाबतची माहिती आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचेही महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले. 

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हेच आपल्या हातात 
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्याची कारणे शोधली असता लग्न, वाढदिवस, अंत्यविधी यासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहिल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण अधिक वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासन व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही कोरोनाच्या बाबतीत आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com