मुंबई - बांगलादेशातील मुलींना फसवून देहविक्रयासाठी भारतात आणल्यानंतर त्यांच्या कमाईचा पैसा हवालामार्फत या मुलींच्या कुटुंबाला पाठवला जातो. याच पैशातून बांगलादेशी दलालांनी तिकडे कोट्यवधींची मालमत्ता उभी केल्याचे पालघर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
14 ते 23 वयोगटांतील मुलींना फूस लावून किंवा नोकरीच्या प्रलोभनाने देहविक्रयाच्या रॅकेटमध्ये ओढणाऱ्या एकास पालघर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालमधून गजाआड केले होते. मानवी तस्करीच्या या गुन्ह्यात यापूर्वी पालघर पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. पालघर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या या गुन्ह्याचा तपास नुकताच पालघर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिस पथकाने नुकतीच पश्चिम बंगालमध्ये जाऊन एकाला अटक केली. त्याच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.
मुलींची फसवणूक
मुलींच्या तस्करीचे हे रॅकेट पाच वर्षांपासून सुरू आहे. आरोपी हे बांगलादेशातील मुलींना नोकरीचे प्रलोभन देत. पहाटेच्या वेळेस सीमेवरील नदी ओलांडल्यानंतर त्यांना पश्चिम बंगालला आणले जायचे. सीमा ओलांडल्याने पोलिस पकडून तुरुंगात टाकतील, अशी भीती या मुलींना घातली जायची. पर्याय नसल्याने त्या देहविक्रयाच्या रॅकेटमध्ये ओढल्या जायच्या. त्यांना मुंबई, पुणे, हैदराबाद येथे पाठवले जायचे. सीमा ओलांडल्यानंतर तस्करीतील व्यक्ती मुलींना बॅंक खाते क्रमांक द्यायची. त्या खात्यात त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले जायचे. या पैशातून आरोपींनी बांगलादेशात पोल्ट्रीफर्म आदी कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे.
दलालांचे कमिशन
रॅकेटमधील एक जण मुलींना फसवायचे काम करायचा. दुसरा त्यांची ने-आण करायचा. तिसरा हा देहविक्रयातील मुलींकडील पैसा दलालामार्फत जमा करायचा. चौथी व्यक्ती हा जमा झालेला पैसा हवालामार्फत पीडित मुलींच्या नातेवाइकांना पोचवत असे. यातही आरोपी त्यांचे कमिशन काढत असायचे. भारतातील एक हजार रुपयांना बांगलादेशात 1300 रुपये दर आहे. यातील एक हजार रुपये मुलीच्या नातेवाइकाला, दोनशे रुपये आरोपींना आणि 100 रुपये सीमेवर लाच देण्यासाठी असायचे.
छळ आणि वसुली
अल्पवयीन मुलींना एक लाख, तर 18 ते 23 वयोगटातील युवतींना 50 ते 60 हजार रुपये इतका दर होता. पैसे वसूल होईपर्यंत महिला दलालांकडून त्यांचा छळ सुरू असायचा. पैसे वसूल झाल्यानंतर या मुलींना दुसरा दलाल विकत घ्यायचा.
|