मुंबई: सध्या पंजाबमध्ये (punjab) सुरु असलेल्या राजकीय घडामोडी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनल्या आहेत. पंजाबमध्ये नेतृत्व बदलाचा विषय ज्या पद्धतीने हाताळला गेला, त्यातून काँग्रेसमधील (congress) अंतर्गत मतभेद, दुफळी, वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसच्या राजकीय कुशलतेबद्दल राजकीय जाणकारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाने आजच्या अग्रलेखात याच पंजाबमधील राजकारणावरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. खरंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (ncp) राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत काँग्रेसही सहभागी आहे. पण आजच्या सामनाच्या अग्रलेखात काँग्रेसला उपदेशांचे डोस देताना टीकाही करण्यात आली आहे.
"काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?" असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
"पंजाबचा सुभा याक्षणी मुळापासून हादरला आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे" असे अग्रलेखात म्हटले आहे.
"पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय? कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवानीसारखे तरुण काँग्रेस पक्षात आले. गुजरातचा हार्दिक पटेलही आलाय. पण त्यामुळे काँग्रेस उसळी मारू शकेल काय?" असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.