Raj Thackeray criticize Jayant Patil Raju Shetti satara
Raj Thackeray criticize Jayant Patil Raju Shetti satara sakal

राज ठाकरे कोणाच्या हातचे बाहुले? जयंत पाटलांचा सवाल

मी तर त्यांच्या कलेचे कौतूक करतो, अशा शब्दात जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली

सातारा : राज ठाकरे हे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न करत असून ते कोणाच्या हातचे बाहुले झालेत, असा प्रश्न करून त्यांच्या सभांचा काहीही परिणाम होणार नाही. नकलाकाराकडून वेगळ्या अपेक्षा काय ठेवायची. मी तर त्यांच्या कलेचे कौतूक करतो, अशा शब्दात जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. दरम्यान, चंद्रकांत दादा हिमालयात जाणार असतील, तर मी त्यांना सोडायला जायला तयार आहे, असा चिमटाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वाई, मेढा येथील बैठका संपल्यानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. परिवार संवाद यात्रेचा परिणाम सांगताना ते म्हणाले, परिवार संवाद यात्रा २३० मतदारसंघातून नेली आहे. जेथे आमचा एकही आमदार नाही, अशासह सर्व ठिकाणी उत्स्फुर्तपणे कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून परिवारातील चांगला संवाद झाला आहे. सध्याच्या राजकिय घडामोडींचा यात्रेवर कोणताही परिणाम दिसत नाही, असे त्यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, भोंग्याबाबत भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेली राज्ये आहेत. त्या ठिकाणी भोंगे काढण्याबाबतची कृती झालीय का, हे त्यांनी तपासावे. राज ठाकरे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न करत असून ते कोणाच्या हातचे बाहुले झालेत हे सर्वांना माहिती आहे. त्याविषयी अधिक बोलणे योग्य नाही. त्यांच्या सभांचा काहीही परिणाम होत नाही. त्यांच्यावर केलेल्या टीकेला जयंत पाटील म्हणाले, नकलाकाराकडून वेगळी अपेक्षा काय ठेवायची त्यांच्या कलेचे मी कौतूक करतो.

साताऱ्याचे दोन्ही राजे राष्ट्रवादीत नसल्याने काय परिणाम झाला आहे काय, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, दोन्ही राजे पक्ष सोडून गेलेले असले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाललेले नाहीत. मी वाई, मेढा, सातारा येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला पण थोडीशी पडझड मागील वेळीची असली तरी कार्यकर्ते संघटीतपणे काम करत आहेत. पवार साहेबांना मानणारा जिल्हा असून आगामी निवडणुकीत आम्ही गमावलेले आमदार परत मिळवू शकतो का, याची चाचपणी आम्ही केली आहे.आगामी निवडणूका स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून याविषयी ते म्हणाले की, यावर स्थानिक नेते बसून ठरवतील, त्यांना अधिकार दिले जातील. एखाद्या पक्ष स्वतंत्र जाण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र येतील, साताऱ्यात एकत्र की वेगळे लढायचे हे नेते मंडळी निर्णय घेतील.

चंद्रकांत दादा हिमालयात जाणार असतील, तर मलाही त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. कारण, उकाडा वाढला असून दादांना सोडायला जायला मी तयार आहे. पण, भाजपवाले बोलेल तसे वागत नाहीत. दादांचा युक्तीवाद आहे मी उभा राहिलो नाही, मी उभा राहिल असतो तर विजयाची संधी होती. आम्हाला ते सोईचे प्रदेशाध्यक्ष वाटतात. पण तो चांगला भला माणूस आहे. भाजपने त्यांना दिर्घकाळ अध्यक्ष ठेवावा, कारण ते माझा चांगले ओळखीचे असून त्याचा आम्हाला फायदाचा होईल.

राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सोडल्याबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले, विधानसभेत ते मित्रपक्ष होते. काँग्रेस, शिवसेना व आमचे सरकार शेतकरी समस्यांवर धावून गेले. कर्जमाफी योजना राबवली, कोरोनात कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. नैसर्गिक आपत्तीत आम्ही हजारो कोटी खर्च केले आहेत. आताच्या अर्थसंकल्पात ५० हजार अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी प्रचंड काम केले आहे. भाजपने चुकीचे कायदे केले ते मागे घ्यावे लागले. पण शेट्टींनी महाविकास आघाडी सोडण्याचे कारण नव्हते. पण, प्रत्येकाला आपले भविष्य पहायचे असते कोणत्या मतदारसंघात कोण उभे राहणार, याची माहिती समजल्याने शिवसेना असेल म्हणून त्यांनी हे पाऊल टाकले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com