मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे थेट प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारात पडतात. आज एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
आपण मूळ प्रश्नांना कधी हात घालणार. फक्त मेट्रो बांधून किंवा फ्लायओव्हर बांधून ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार नाही. आज पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. गाड्यांचं रजिस्ट्रेशन करताना आपण विचार करत नाही की ह्याला पार्किंग मिळणार का? अशा प्रश्नांचा विचार कधी करणार?, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले, "आज पण मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, ते का सुटले नाहीत ह्याचा विचार आणि चर्चा व्हायला हवी, ती जो पर्यंत होत नाही तो पर्यंत 'व्हिजन'च्या चर्चानी काय साध्य होणार? जोपर्यंत मुंबई-पुण्याच्या बाहेरच्या महाराष्ट्राच्या विकास होणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. पुणे-मुंबईचा विस्तार कुठवर होतोय हेच कळत नाही. शहरात येणाऱ्या लोंढ्यांचा विचार केला जात नाही तो पर्यंत सगळ्या चर्चा पोकळ आहेत."
आज राजकारण्यांना बसवून त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्याची गरज आहे. ह्यासाठी माझ्यासकट सगळ्या राजकारण्यांना बसवा, तज्ज्ञांकडून आम्हाला प्रेझेंटेशन द्या आणि मग त्या कल्पना आम्ही कधी पूर्ण करणार हे विचारा, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.
पक्ष स्थापनेच्या वेळी जे भाषण मी केलं त्यावेळी मी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आणणार असं सांगितलं. जी मी २०१४ ला महाराष्ट्राला सादर केली. पण आजपर्यंत एकाही पत्रकारांनी ही ब्ल्यूप्रिंट वाचून माझ्याशी चर्चा केली नाही किंवा त्याबाबत कोणीच चर्चा नाही, असं का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, "ज्या पक्षाने लोकांसाठी असंख्य आंदोलन केली. राज्याचा विकास आराखडा सादर केला. विकासाचं मॉडेल राबवून दाखवलं तरीही जेव्हा त्याचं प्रतिबिंब मतदानात उमटत नाही तेंव्हा वाईट वाटतं. पण हरकत नाही लोकं आम्हाला संधी देतील तेव्हा आमचं व्हिजन महाराष्ट्रात राबवू."
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.