पावती अधिवेशनाची अन् प्लॅन ट्रिपचा! शिक्षक अधिवेशन व मेळाव्यास ७०० रुपयांच्या पावतीवर ३ दिवसांची सुटी

१५ ते १७ फेब्रुवारीला राज्यव्यापी अधिवेशन व शिक्षण परिषद होणार आहे. त्यासाठी इच्छुक शिक्षकांकडून ७०० रुपये भरून घेतले जात आहेत. काहींनी पावती फाडून तिकडे न जाता सुट्टी काढून घरी बसण्याचे किंवा ट्रिपला जाण्याचे नियोजन केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
schools
schoolssakal

सोलापूर : शिक्षक संघ व शिक्षक समितीचे रत्नागिरी व वेंगुर्ला येथे १५ ते १७ फेब्रुवारीला राज्यव्यापी अधिवेशन व शिक्षण परिषद होणार आहे. त्यासाठी इच्छुक शिक्षकांकडून ७०० रुपये भरून घेतले जात आहेत. काहींनी पावती फाडून अधिवेशनाला व परिषदेला न जाता सुट्टी काढून घरी बसण्याचे किंवा ट्रिपला जाण्याचे नियोजन केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

शिक्षकांच्या प्रश्नांना राज्यस्तरावर वाचा फोडून ते सोडवून घेण्यासाठी शिक्षकांचे दरवर्षी अधिवेशन व शिक्षण परिषद घेतली जाते. कोरोनामुळे त्यात खंड पडला होता. पण, आता त्याची जोरदार तयारी सुरु आहे. राज्य सरकारला शिक्षकांची ताकद दाखवून त्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यातून भाग पाडणे हा त्यामागील मुख्य हेतू असतो. त्यासाठी यंदा ४० हजारांपर्यंत शिक्षक पावती फाडतील, असा अंदाज आहे.

मात्र, काही शिक्षक अधिवेशनाला जायचे म्हणून संघटनेची पावती फाडतात, पण तिकडे जातच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनीही तोंडावर बोट ठेवले आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आता पावती फाडलेल्या शिक्षकांची यादी केंद्रप्रमुखांकडून गटशिक्षणाधिकारी घेतील. एकाच केंद्रातील बहुतेक शिक्षक अधिवेशन व शिक्षण परिषदेला जाणार असल्याने त्या शाळांवर तीन दिवस शेजारील शाळांमधील शिक्षक नेमण्याचे नियोजन केले जात आहे.

पावती फाडलेल्यांना अधिवेशनाचे बंधन

शिक्षक संघाच्या वतीने रत्नागिरीत १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान राज्यव्यापी प्रश्नांवर शिक्षण परिषद व मेळावा होणार आहे. अधिवेशनाला इच्छुक शिक्षकांची व्यक्तिशः: भेट घेऊन अधिवेशनाला येण्याचा आग्रह केला जात आहे. पण, पावती फाडलेल्या प्रत्येक शिक्षकाने अधिवेशनाला हजर राहणे बंधनकारक आहे.

- म. ज. मोरे, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

शाळा सुरळीत सुरु राहतील, असे नियोजन

शिक्षक संघाचा मेळावा व शिक्षण परिषद १५ ते १७ फेब्रुवारीला तर शिक्षण समितीचे अधिवेशन १५ व १६ फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी बहुतेक शिक्षक जातील, असा अंदाज आहे. पण, शिक्षकांअभावी कोणतीही शाळा बंद राहणार नाही, याची जबाबदारी तेथील प्रत्येक केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर असणार आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

तीन दिवस शाळा एक-दोन शिक्षकांवर

शिक्षकांच्या प्रश्नांवर दरवर्षी शिक्षक संघ व शिक्षक समितीच्या वतीने अधिवेशन घेतले जातात. अधिवेशनाला येणाऱ्या शिक्षकांना ७०० रुपयांची पावती फाडावी लागते. काही शिक्षक पावती फाडतात, पण अधिवेशनाला जातच नाहीत.

पावती फाडल्यावर त्या शिक्षकांना अडीच दिवसांची नैमित्तिक रजा मिळते. शासनाकडून त्या काळातील वेतन संबंधित शिक्षकांना दिले जाते. प्रत्येक जिल्ह्यातील किमान ६० टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षक पावती फाडतात. सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांवरील कार्यरत प्राथमिक शिक्षकांची संख्या नऊ हजार असून त्यातील जवळपास पाच हजार शिक्षक अधिवेशनाला जाणार आहेत. त्यामुळे अवघ्या साडेतीन ते चार हजार शिक्षकांना तीन दिवस जिल्ह्यातील दोन हजार ७९५ शाळांची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com