काय करू आते दादा...द्राक्षे बागकरता सोनं गहाण ठेवलयं..

grapes broke.jpg
grapes broke.jpg

नाशिक : परतीच्या पावसामुळे बागलाण तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी धास्तावले असून द्राक्षे बागेसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात जाणार असल्याची भिती द्राक्षे उत्पादकांना सतावत आहे. अनेक ठिकाणी द्राक्षे बागेतील मन्यांना तडे व भुरी रोगाने ग्रासले आहे. द्राक्षे शेवटच्या टप्प्यात असतांनाच सतत बदलत असलेले हवामान व परतीच्या पावसामुळे तालुक्यात द्राक्षे उत्पादक शेतक-यांना कोट्यवधी रुपयांची झळ बसणार असल्याचे चित्र आहे. द्राक्ष बागायतदार शेतक-यांनी पीक वाचविण्यासाठी कसरतीमुळे लाखो रुपये खर्च वाढत असूनही बाग वाचविणे जिकरीचे झाले आहे.

पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेऊन द्राक्षे बाग उभी 

बहुतांश द्राक्षे उत्पादकांनी बॅक, फायनान्स, सोनं गहाण ठेऊन व हातउसनवार करीत द्राक्षे बागेवर खर्च केला आहे. वायगाव येथील शरद देवरे या द्राक्षे उत्पादक शेतक-याने पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेऊन द्राक्षे बाग उभी केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे त्यांचे स्वप्न धुळीत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गहाण ठेवलेले सोनं सोडावे तरी कसे या विवेचनात ते सापडले आहेत. द्राक्षे झाडांवरील मन्यांना तडे गेल्याने व्यापारी फुकटही घेत नाहीत. पुन्हा द्राक्षे मनी तोडण्यासाठी पन्नास ते साठ हजारांचा खर्च करावा लागणार असल्याचे शेतकरी देवरे यांनी सांगितले. 

विकतचे पाणी घेऊन केल्या होत्या बागा 
वायगाव परिसरात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्याने द्राक्षे उत्पादक शेतक-यांनी एक हजार प्रतिटॅकर विकतचे पाणी घेऊन बागा तयार केल्या होत्या. बागेवर द्राक्षे शेवटच्या टप्प्यात असतांनाच परतीच्या पावसाने हातात आलेले पिक हिरावून नेल्याचे सांगितले. वायगाव परिसरात अरूण वाघ, पोपट आहिरे, परशुराम पवार, हिरामण देवरे, संदिप आहिरे, सुभाष पवार, पोपट पवार, सुनील सोनवणे, आत्माराम पवार, नितिन आहिरे, बापू पवार, भाऊसाहेब पवार आदि द्राक्षे उत्पादक शेतक-यांनी अर्ली बाग उभी केली आहे. तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतक-यांनी अर्ली बागेवर करोडो रूपयांचा खर्च केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र परतीच्या पावसामुळे नाहक तोटा सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

द्राक्षे उत्पादकांची चिंता वाढली

जुलैमध्ये द्राक्षे छाटणी केली होती. प्रतिकुल परिस्थितीत बाग फुलविली बॅके कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत होती. सोनं गहाण ठेऊन व हातउसनवार करून द्राक्षे बाग उभी केली. परतीच्या पावसामुळे अपयश आले. या परिस्थितीतुन मायबाप सरकारने हातभार लावावा. अशीच अवस्था शेतक-यांची राहिली तर तरूण शेतकरी शेतीकडे जाणारही नाहीत - विनोद वाघ, द्राक्षे उत्पादक वायगाव  

आधीच मका पिकावर लष्करी आळीने अतिक्रमण केल्याने नुकसान झाले. त्यानंतर द्राक्षे बागेवर परतीच्या पावसाने घास हिरावून नेला गहाण ठेवलेले सोनं सोडावे तरी कसे या विवेचनात सापडलो आहे. - देवीदास वाघ, द्राक्षे उत्पादक 

.माझा दिड एकरचा द्राक्षे बाग आहे. बाग तयार झाली होती मात्र परतीच्या पावसामुळे संपूर्ण बागेतील मन्यांना तडे गेले असल्याने व्यापारीसुध्दा फिरकत नाहीत बागेतील घडांना काढण्यासाठी आता पैशांची नितांत गरज आहे. - जितेंद्र आहिरे, द्राक्षे उत्पादक वायगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com