
राणे, भुजबळांनीही असचं भाषण केलं होतं; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता तीव्र होत आहे. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना चौफेर फटकेबाजी करत अनेक खुलासे केले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. त्याला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. (Sanjay Raut reply to CM Eknath Shinde)
हेही वाचा: चाणक्याला चंद्रगुप्त शोधावाच लागतो - देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदेच्या भाषणावर बोलताना राऊत म्हणाले की, शिंदेंचं भाषण चांगल झालं असेल. याआधी नारायण राणे आण छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. त्यांनी देखील अशाच प्रकारे भाषण केलं होतं, असं म्हणत राऊत यांनी शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं.
उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या चार लोकांमुळेच शिवसेनेची ही अवस्था झाल्याचं शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यावर राऊत म्हणाले की, त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते चार लोक सतत पक्षाचंच काम करत होते. त्यांना तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे काय दुधखुळे नाहीत. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात.
हेही वाचा: आम्ही बंड नाही, अन्यायाविरुद्ध उठाव केला : गुलाबराव पाटील
दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून आमदार आदित्य ठाकरे यांना वगळून 14 आमदारांना व्हीप न पाळल्याबद्दल अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे हबे बाळासाहेबांचे नातू असल्याने त्यांना वगळण्यात आल्याच शिंदे गटाकडून सांगण्यात आलं. यावर राऊत म्हणाले की, बाकीचे 14 आमदार हे बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहेत.
एकनाथ शिंदे याचं भाषणात राज्याची भूमिका नव्हती. मी पक्ष का सोडला हेच खुलासे होते. लोकांच्या भावनांना हात घालणारे भाषण होते. पक्ष सोडणाऱ्यांना असचं भाषण करावं लागतं. नारायण राणे यांनी देखील शिवसेना सोडल्यावर असच भाषण केलं होतं. आमदार किंवा खासदार गेले म्हणजे मतदार जातात, असं होत नाही, असंही राऊत यांनी नमूद केलं.
हेही वाचा: ..म्हणून अपात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं!
एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सभागृहात दमदार भाषण केलं होतं. ‘पदाच्या लालसेपोटी मी कधीही काम केले नाही. शिवसेना वाचवण्यासाठी मी एकटा शहीद झालो तरी चालेल. मी लढेन आणि मरेन, पण मी मागे हटणार नाही. राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान माझ्याशी खालच्या दर्जाची वागणूक मिळाली. माझे बाप काढण्यात आले,” या सर्व गोष्टी या बंडामागे आहेत,’ असे शिंदे यांनी सांगितले. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या साथीत 200 जागा निवडून आणू असंही म्हटलं होतं.
Web Title: Sanjay Raut Reply To Cm Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..