मुंबई - 'कॉंग्रेसने कितीही द्वेष केला, दुर्लक्ष केले; तरी स्वातंत्र्यवीर सावरकर संपणार नाहीत. सावरकरांचे कौतुक, वर्णन करण्याची काही आवश्यकता नाही. पारतंत्र्याच्या काळोखात लखाखून गेलेली ती वीज होती. सावरकरांना "भारतरत्न' मिळायलाच हवे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वा. सावरकर यांच्या प्रति भावना व्यक्त केल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात "सावरकर - इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट' या पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, क्रांतिकारक आणि दहशतवादी यात फरक आहे. सावरकर यांची क्रांती रक्तरंजित किंवा आतंकवादी नव्हती, तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती, तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता. असे स्वातंत्र्यवीर हे आपल्याला आद्याप समजलेच नाहीत, ही शोकांतिका आहे. वल्लभभाई पटेल मुख्यमंत्री असते तर काश्मीरचा प्रश्न कधीच सुटला असता. पण, सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता, असे प्रतिपादन उद्धव यांनी केले. "गांधी-नेहरू यांना मी मानतोच. पण, या देशात काय दोनच घराणी जन्माला आली का,' असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.
|