सोलापूर : राज्यात जुलै ते ऑक्टोबर या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार 214 कोटी रुपयांची मदत दिली. मात्र, अद्याप राज्यातील सुमारे साडेदहा लाख शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून त्यासाठी केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्याचे अडीच हजार कोटी रुपये मिळतील, असे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.
ठळक बाबी...
परतीच्या पावसाने पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. मुख्यमंत्र्यांनी 'खचू नका धीर, ठाकरे सरकार आहे खंबीर' म्हणत बळीराजाला धीर दिला. राज्य सरकारने दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. परंतु शेती पिकांच्या नुकसानीसाठी पहिल्या टप्प्यात बावीसशे कोटींचीच मदत मिळाली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन मदत देण्याचे आश्वासन दिल्याचे खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, केंद्राकडून किती मदत मिळावी, याबाबत अद्याप रक्कम निश्चित झालेली नाही. किती शेतकरी मदतीपासून वंचित राहिले, त्यांच्यासाठी किती रक्कम लागणार आहे, यावरुन पुढील आठवड्यात रक्कम अंतिम करुन केंद्र सरकारकडे मदत मागितली जाणार आहे. डिसेंबरअखेर मदतीचा दुसरा हप्ता मिळेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दुसऱ्या हप्त्याचा अद्याप निर्णय नाही
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता वितरित केला आहे. दुसऱ्या हप्त्याचा निर्णय अजून झाला नसून, त्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीच्या रकमेची मागणी केली जाणार आहे.
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.