‘एल्गार’ परिषदेच्या तपासाबाबत शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट 

sharad pawar
sharad pawar

जळगाव : सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राज्याकडून काढून घेत तो राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला आहे, केंद्राला निश्‍चितपणे तपासाचा अधिकार आहे; परंतु त्यांनी राज्य सरकारची सहमती घ्यायला हवी होती. ती त्यांनी घेतली नाही. तरीही राज्याला स्वतंत्र चौकशीचा अधिकार आहे.

एल्गार परिषदेत सरकारविरोधी वक्तव्ये करणाऱ्यांना तसेच लिखाण करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्यात आले. हे अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांच्या या तपासाची चौकशी करण्यासाठी निवृत्ती न्यायाधीशांची समिती नियुक्त करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. जळगाव येथील जैन हिल्सवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचे सत्य बाहेर आले असते. त्यामुळे हे सत्य दडपण्यासाठीच केंद्र सरकारने हा तपास काढून घेतल्याचे पवार यांनी सांगितले. सरकारच्या स्थैर्यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षात ज्योतिष जाणणारे अधिक लोक आहेत, त्यामुळे ते नेहमी राज्यातील सरकार पडण्याचे भविष्य वर्तवीत असतात. आम्ही ग्रामीण भागातील मंडळी आहोत, आम्हाला ज्योतिष काही कळत नाही. मात्र, पुढची चार वर्षे राज्यातील सरकारला काही धोका नाही, असे आम्हाला तरी दिसतेय, अशी कोपरखळी पवार यांनी भाजपला मारली. 

दिल्लीचे परिणाम पुढेही दिसणार 
दिल्लीच्या निकालाबाबत पवार म्हणाले की, दिल्लीमध्ये सर्व राज्यांतील लोक राहतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या निवडणूक निकालाचा अर्थच वेगळा आहे. ‘मिनी इंडिया’ने दिलेला हा निकाल आहे. या ठिकाणच्या जनतेने ‘आप’ला विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची हुकमत नाकारली आहे. या निकालाचे परिणाम पुढील सर्व निवडणुकीतही दिसून येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com