नाशिक : तरुण पिढीने पटकन यश मिळवण्याची घाई करू नये. त्याऐवजी जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये मिसळावे, त्यासाठी कष्ट घ्यावेत. जाणकारांशी सुसंवाद साधावा. सतत वाचन करावे. त्यातून स्वतःचे नेतृत्व स्वतःच्या पायावर उभे करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचे बुधवारी (ता.६) पहिले ऑनलाइन पुष्प पवार यांनी गुंफले. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या अनुषंगाने माजी आमदार हेमंत टकले यांनी पवार यांची मुलाखत घेतली.
महाराष्ट्रात आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांच्या रूपाने नेतृत्वाची फळी नव्या पिढीला दिलेल्या संधीतून उभी राहिली, याचा दाखला देऊन पवार यांनी ज्ञानी माणसांकडून जाणून घ्यायला मला अडचण वाटत नाही, असे स्पष्ट केले. देशाचे संरक्षणमंत्रिपद मिळाल्यावर दिल्लीहून मुंबई अन् थेट कोल्हापूर गाठले. जनरल थोरात यांच्याकडून सात तास संरक्षणविषयक माहिती घेतल्याचे उदाहरण त्यांनी तरुण पिढीपुढे ठेवले. पुस्तकांप्रमाणे माणसं वाचायला मिळतात. माणसं शिकवतात. त्यातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगून पवार म्हणाले, की कसमादे, नाशिक, पुणे, अमरावती, अकोला अशा राज्याच्या विविध भागांमध्ये मराठी भाषेत फरक आहे. त्या भागातील लोकांमध्ये मिसळल्याने भाषेशी समरस होत आनंद मिळाला. त्यामुळे ज्या भागात संवाद साधायचा तिथले शब्द वापरल्याने समाज घटकांशी नाते जुळले गेले. तरुण पिढीबरोबर संघटनात्मक काम करत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीने प्रवास केला. संघटनेतील सहकाऱ्याच्या घरी मुक्काम केला. त्यामुळे कौटुंबिक सलोखा निर्माण झाला. प्रश्न समजले. शेती, शिक्षण, उद्योग-धंद्यातील घटकांशी संवाद साधता आला.
क्रिकेट म्हणजे भारत
वयाच्या ८१ व्या वर्षीदेखील तरुणांशी संवाद साधण्याची इच्छा पवार यांच्या संवादातून डोकावत होती. खेळाबद्दल असलेल्या आवड आणि आस्थाविषयी ते म्हणाले, की कबड्डी, खो-खो आणि पुढे क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद मिळाले. क्रिकेटविषयक आस्था आहे. तसेच सासरे खेळाडू असल्याने ज्येष्ठ क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबातील आहे, असे माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद मिळाल्यावर खेळाडूंच्या प्रश्नांमध्ये लक्ष द्यायला सुरवात केली. खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी गुंतवणूक सुरू केली. अन्य राज्यांना सुधारणा पाहिल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद माझ्याकडे दिले गेले. त्या वेळी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या तुलनेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिजला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या संघटनेत फारसे स्थान नव्हते. त्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव पाकिस्तानने सुचवले. त्यास बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिजने पाठिंबा दिला. निवडणूक होणार म्हटल्यावर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडने माघार घेतली आणि मला बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर राबवलेल्या उपक्रमातून क्रिकेट म्हणजे, भारत असे समीकरण तयार झाले. क्रिकेट स्पर्धांमधून खेळण्यासाठी जगातील खेळाडू भारतात यायला लागले. त्यातून संघटनेला मिळालेल्या पैशांमधून निवृत्त क्रिकेटपटूंना संधी मिळत गेली. ज्येष्ठांना पेन्शन सुरू केली. त्यातून क्रिकेट क्षेत्रात चैतन्य सळसळू लागले.
ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांनी उपक्रमाची माहिती दिली. शंकराचार्य न्यासातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी यांनी सांगितले. टकले यांनी पवार यांचा विविध क्षेत्रातील प्रवास उलगडून दाखवला.
शरद पवार म्हणाले…
० ज्योती स्टोअर्सचा उपक्रम वेगळ्यास्तरावर नेण्यासाठी नाशिकमधील कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्त्वाचा सहभाग राहिला
० तरुण असताना वर्तमानपत्र सुरू केले. वर्षभर चालले आणि बंद पडले
० महाराष्ट्र युवक काँग्रेसची जबाबदारी असताना प्रकाशनाची जबाबदारी माझ्यावर होती
० शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आम्ही चार मित्रांनी मराठीतील राजनीती मासिक सुरू केले. त्याचा पहिला आणि शेवटचा अंक राहिला
० लेखक म्हणून घेणे मला उचित वाटत नाही. आयुष्यामध्ये आलेल्या अनुभवाची मांडणी ‘लोक माझे सांगाती’मध्ये केली
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.