मुंबई : राज्यात मविआ सरकार पडल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. यांनंतर दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार म्हणत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केलीय.
फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यासह अनेक नेत्यांनी त्यांनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम कराव लागतं असल्याच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. शरद पवार यांनी तर त्यांच्या चेहर्यावरून ते नाराज असल्याचं दिसत असल्याचं म्हटलं होतं, त्यांनंतर राज ठाकरे यांनी यांनी वेगळी भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या फडणवीस यांचं कौतुक केले आहे
दिपाली सय्यद यांनी ट्विट करत मनसे अध्यक्षांना सवाल केला आहे की, "दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार माननीय राजसाहेब कधीतरी १ आमदारा वरून तुमचा धनुष्यबाण २ आमदारावर पोहचवुन जनतेला दाखवुन द्या कि कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे!" असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
राज ठाकरे काय म्हणालेत?
राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे, एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.