मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा सूर कार्यकर्त्यांमधून येताना दिसतोय. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी सूचक विधान केलंय. त्यावर शिवसेनेनं प्रतिक्रियाही दिली आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेनेकडे अद्याप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रस्ताव आलेला नाही. मात्र याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनाच असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यामुळे उद्धव-राज एकत्र येण्यासाठी कोण पुढाकार घेणार हे येणार काळाच ठरवणार आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या की, "साद घातली तर येऊ देत" आगामी काळातील मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत घेऊन शिवसेनेत बंड पुकारलं आणि भाजपसोबत वेगळी चूल मांडत सत्ता काबीज केली. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची शिवसेना अडचणीत आली. यानंतर आता शिवसेनेकडून पक्ष संघटन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.