Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही सरकार मात्र त्याबाबत गंभीर दिसत नाही. सरकारने जागे व्हावे, असे आम्ही आवाहन करत आहोत.
sharad pawar
Sharad Pawar esakal

मुंबई - ‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही सरकार मात्र त्याबाबत गंभीर दिसत नाही. सरकारने जागे व्हावे, असे आम्ही आवाहन करत आहोत. त्यातूनही सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्हाला इतर पर्याय आहेत,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत गंभीर, तर १६ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ पडला आहे. एकंदरीत ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास दुष्काळाची परिस्थिती भीषण होईल.

दुष्काळ आहे त्याठिकाणी मागणीपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने लोकांची वणवण होत आहे. महाराष्ट्रातील १५०० मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे.’ देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्र राज्यात आहेत, पण यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर असल्याचेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी मराठवाड्यातील दुष्काळस्थितीकडेही लक्ष वेधले. ‘संभाजीनगरमध्ये १,८६७ टँकर लागत आहेत. वेळीच लक्ष दिले नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात यंदा १०, ५७२ टँकर लागत आहेत. मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल,’ असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात पाणीटंचाई बाबत बैठक घेतली. मात्र या बैठकीला पाच पैकी दोनच पालकमंत्री येत असतील तर याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली. राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्हात दुष्काळाच्या बाबतीत अधिक गंभीर परिस्थिती असताना तेदेखील बैठकीला हजर नसतील, तर हे आणखी चिंताजनक असल्याचे सांगत पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली.

फडणवीसांची पाठराखण

पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम योग्य असल्याचे सांगत शरद पवार यांनी त्यांची पाठराखण केली. तसेच या प्रकरणाला वेगळे वळण देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘राज्यघटनेबाबतची मानसिकता दिसून येते’

‘राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्र्लोक आणि मनाचे श्लोक समाविष्ट करणार असल्याचे समजले. यावरुन राज्य सरकारची संविधानाबाबतीत काय मानसिकता आहे, हे लक्षात येते,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ‘सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमके काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. याबाबत प्रागतिक विचारांचे जे लोक आहेत, त्यांनी लक्ष घालावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

सरकारकडे मागण्या

  • वीजपुरवठा खंडित करु नये

  • शैक्षणिक शुल्क माफ करावे

  • पीककर्जाचे पुनर्गठन करून कर्जवसुलीला स्थगिती द्यावी

  • शेतकऱ्यांनी भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करत आहेत, त्यात केंद्राने हस्तक्षेप करावा

  • चारा छावण्यांची उभारणी करावी

  • छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी कामे काढावीत

  • दुष्काळ उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करावी

  • अवकाळी, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com