...तर साखर समुद्रात बुडवावी लागेल

...तर साखर समुद्रात बुडवावी लागेल

सातारा/ सांगली - यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका. सिंचन योजनेवर ऊस पिकवणे थांबवा अन्यथा साखर समुद्रात बुडवावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

 उसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या, अशी सूचनाही त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आज केली.  

सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील विविध सिंचन योजनांच्या व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांचे भूमिपूजन नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

गडकरी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री व मी ठरविले आहे, की महाराष्ट्रातील ५० टक्के जमीन सिंचनाखाली आणायची. त्यासाठी जुन्या व अपूर्ण प्रकल्पांना प्रधानमंत्री आणि बळिराजा कृषी सिंचन योजनेतून ५६० कोटींची रक्कम दिली आहे. उर्वरित दोन हजार कोटी रुपये नाबार्डचे कर्ज मंजूर करून दिले आहे. मी आणि मुख्यमंत्री विदर्भातील असल्याने पश्‍चिम महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. पण, आम्ही पश्‍चिम महाराष्ट्रासाठी आठ हजार पाचशे कोटी रुपये दिले आहेत. आता पाणी येणार आहे म्हणून ऊस लावत बसू नका. पीक पध्दतीत बदल करा. आमची ताकद उसाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाया घालवू नका. ऊस पिकवला आणि राजू शेट्टी आंदोलनाला उभे राहिले. मात्र, यापुढे ऊस दरासाठी व साखरेसाठी अनुदान देता येणार नाही. त्यामुळे आमच्याकडे साखर अनुदान मागायला येऊ नका, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. 

‘‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सारखेचे दर १९ रुपये आहेत. केंद्राने ३४ रुपये दर गृहित धरून उसाला दर दिला आहे. त्यामुळे दरासाठी टोकाचे आंदोलन करू नका. भविष्यात यापेक्षा जास्त पॅकेज देणे शक्‍य नाही. त्यामुळे कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. राज्यानेही उसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पांना प्राधान्य द्यावे. कितीही इथेनॉल तयार झाले तरी, विकत घेण्याची आमची तयारी आहे. पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करण्याकडे शेतकऱ्यांनी आता वळावे. त्यातून चांगला दर मिळेल. महाराष्ट्रात पाच लाख कोटींची रस्त्यांची कामे मंजूर झाली असून ही सर्व कामे उत्तम दर्जाची व भ्रष्टाचारमुक्त आहेत,’’ असे गडकरी म्हणाले.

जीभ घसरली
सांगलीतील नागज (ता. कवठे महांकाळ) येथे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जीभ घसरली. शेतकरी मेळाव्यात टेंभू सिंचन योजनेसंदर्भात बोलताना गडकरी यांनी वादग्रस्त विधान केले. ‘‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून रखडली होती. ती पूर्ण होईल, असे आम्हालाही वाटले नव्हते. खरे तर इथे ते बोलू नये. एक वेळ हिजड्याशी लग्न केले तर मुले होतील, पण सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही. भाजप सरकारच्या काळात ते पूर्ण झाले. येथील शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाले. तसेच यांसारख्या अनेक योजना भाजप सरकारच्या काळात पूर्ण झाल्या,’’ असे गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com