सोमेश्वरनगर - केंद्रसरकारच्या कायद्यात फेरफार करत राज्यसरकारने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी एफआरपीचे तुकडे करणारा काढलेला आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ऊस तुटल्यापासून चौदा दिवसात एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग तब्बल तीन वर्षांनी मोकळा झाला आहे. या निर्णयाने राज्यसरकार आणि साखरसंघाला जोरदार दणका बसला आहे.
केंद्रासरकारच्या ऊस नियंत्रण कायदा-१९६० अन्वये गतहंगामाचा उतारा विचारात घेऊन ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्याला एकरकमी एफआरपी (रास्त व उचित दर) अदा करणे बंधनकारक होते. राज्यसरकारने १०.२५ टक्के या पायाभूत उताऱ्यानुसार पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर अंतिम उताऱ्यानुसार उर्वरीत हप्ता असे सूत्र ठरवले.
शेतकरी संघटनांनी याविरोधात आंदोलने केल्यावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेसोबत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काही मंत्री, अधिकाऱ्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे दोन वेळा आश्वासन दिले. मात्र अधिकृत शासन निर्णय होत नसल्याने स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
जानेवारीपासून सुरू असलेल्या वाद-प्रतिवादानंतर २० फेब्रुवारीस निकाल राखून ठेवला होता. अखेर आज एकरकमी एफआऱपीचा निर्णय झाला. शेट्टी यांच्या वतीने अॅड. योगेश पांडे, राज्यसरकारच्या वतीने महाभियोक्ता अॅड. बिरेन सराफ, साखरसंघाच्या वतीने अॅड. अनिल अंतुरकर, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेकडून अॅड. सतीश गुरूरकर यांनी बाजू मांडली.
अॅड. योगेश पांडे म्हणाले, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्रसरकारच्या निर्णयात फेरफार केलेला चालणार नाही असा क्रांतिकारक निर्णय देत राज्यसरकारला दणका दिला आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांशी व्यक्तिगत करार केले तरच टप्पे होऊ शकतात मात्र राज्यसरकारला तो अधिकार नाही असे न्यायालयाने खुलेपणाने सांगितले. न्यायालयाचा सविस्तर निकाल आल्यावर अधिक बोलता येईल.
राज्यसरकारने एफआरपीचे तुकडे करत बेकायदेशीर कृत्य केले होते. सर्व पक्षातील कारखानदारांचे हे षडयंत्र होते फक्त एकनाथ शिंदे यांनीच आमची बाजू घेतली. सगळ्या शेतकरी संघटना या मुद्द्यावर एकत्र होत्या. मात्र शेतकऱ्यांनीच उभारलेल्या साखरसंघानेही शेतकरीविरोधी भूमिका घेतली होती.
राज्याचे महाभियोक्ताही चार दिवस न्यायालयात बसून होते. या सर्वांचा सणसणीत पराभव झाला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. चालू हंगामातच शेतकऱ्यांचे सात ते आठ हजार कोटी थकले आहेत ते वसूल होतील, अशा भावना याचिकाकर्ते राजू शेट्टी यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.