कायद्याचं बोला! आई-वडिलांचा सांभाळ न केल्यास मुलाच्या नावावरील मालमत्तेचे खरेदीखत, बक्षीसपत्र रद्द होईल; पालकांनी तक्रार केल्यास प्रांताधिकाऱ्यांना ते अधिकार

पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा-२००७ नुसार वयाच्या ६० वर्षानंतर मुले आपल्याला सांभाळत नसल्यास आई-वडिलांनी मुलांच्या नावे केलेली मालमत्ता पुन्हा परत देण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिकाने प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यास सुनावणीअंती कितीही वर्षांपूर्वी मुलांच्या नावे केलेले बक्षीसपत्र, खरेदीखत रद्द होते. त्यासाठी एक रुपयाही खर्च येत नाही.
parents
parentssakal

सोलापूर : पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा-२००७ नुसार वयाच्या ६० वर्षानंतर मुले आपल्याला सांभाळत नसल्यास आई-वडिलांनी मुलांच्या नावे केलेली मालमत्ता पुन्हा परत देण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिकाने प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यास सुनावणीअंती कितीही वर्षांपूर्वी मुलांच्या नावे केलेले बक्षीसपत्र, खरेदीखत रद्द होते. त्यासाठी एक रुपयाही खर्च येत नाही.

वडिलोपार्जित मालमत्ता नियमानुसार त्या व्यक्तीच्या मुलांच्या नावे होते, पण त्यातही मुला-मुलींना समान हक्क असतो. पण, अनेकदा मुलांच्याच नावे जमीन, मालमत्ता केली जाते. अनेक बहिणींनी देखील न्यायालयात धाव घेतल्याची उदाहरणे आहेत. दुसरीकडे मुले आपल्या आई- वडिलांना गोड बोलून व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी कर्ज काढायचे आहे, जमीन विकसित करूयात अशी विविध कारणे देऊन त्यांच्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावे करतात. तोपर्यंत त्यांचा सांभाळ व्यवस्थितपणे केला जातो.

एकदा का मालमत्ता नावावर झाली की, काही दिवसांनी वादविवाद सुरु होतात आणि एक दिवस तोच मुलगा आपल्या वृद्ध माता- पित्यांना घराबाहेर काढतो, ज्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते. पण, अशावेळी कायद्याने त्यांना आधार दिला असून त्याद्वारे त्यांना त्याच मुलाच्या नावावर केलेली मालमत्ता पुन्हा परत मिळविण्याचा अधिकार त्या वृद्ध माता- पित्यांना आहे.

टेंभुर्णी पोलिसांत दोन गुन्हे...

  • १) पतीच्या निधनानंतर मुलाकडे आधार म्हणून पाहणाऱ्या आईला त्याने विवाहानंतर पत्नी व तिच्या आईचे ऐकून जन्मदात्या आईलाच घराबाहेर हाकलले. तत्पूर्वी, त्या मुलाने आई- वडिलांच्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली होती. मुलगा आपल्याला सांभाळत नाही म्हणून व्यतीत त्या निराधार आईने पोलिसांत धाव घेतली.

  • २) पत्नीच्या मृत्यूनंतर एकटे पडलेले वडील मुलाकडे राहायला होते. आपल्या मुलाचा त्यांनी थाटात विवाह लावून दिला. पण, विवाहानंतर काही दिवसातच त्या मुलाने जन्मदात्या बापाला सांभाळण्यावरून घराबाहेर काढले. त्याने आपल्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतली आणि सुनेचे ऐकून तो आता मला सांभाळत नाही अशी तक्रार घेऊन त्या वयस्कर बापाने पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांच्या भरोसा सेलमध्येही वृद्ध पालकांची धाव

ज्या मुलाला तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळले, स्वतः उपाशी राहून त्याला पोटभर घातले, त्याचे शिक्षण केले. आता तो नोकरीला लागला किंवा स्वतःच्या पायावर उभारला. ज्यावेळी आता वृद्ध माता- पित्यांना त्यांचा आधार हवा आहे, त्याचवेळी तो घराबाहेर काढू लागला आहे. त्यातूनच वृद्धाश्रमांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक वृद्धांनी पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मध्ये न्यायासाठी धाव घेतल्याचीही वस्तुस्थिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलाच्या जन्मावेळी आनंदी झालेल्या आई-वडिलांना तोच मारहाण करीत आहे. काहींनी तर जन्मदात्या आई-वडिलांचा प्रॉपर्टीसाठी खून केल्याची उदाहरणे आहेत.

बक्षीसपत्र किंवा खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार

अनेकदा मुले आई- वडिलांच्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावे करतात आणि वृद्ध झाल्यावर त्यांना सांभाळत नाहीत. अशावेळी त्या ज्येष्ठ नागरिकांना ती वडिलोपार्जित किंवा स्वतः कमावलेली व मुलांच्या नावे केलेली मालमत्ता ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्यानुसार पुन्हा परत घेण्याचा अधिकार आहे. ते बक्षीसपत्र किंवा खरेदीखत रद्दचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहे.

- सदाशिव पडदुणे, प्रातांधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com