नांदेड: तासिका तत्त्वावर प्राध्यापकांना नियमित प्राध्यापकांच्या तुलनेत १० टक्केही वेतन मिळत नाही. एकच शैक्षणिक पात्रता, समान काम असताना वेतन मात्र वेगवेगळे दिले जात असल्याने तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांमध्ये शैक्षणिक काम करताना न्यूनगंड तयार होतो आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होताना दिसून येत आहे. शासकीय व अनुदानित महाविद्यालयात ४० ते ५० टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर निश्चितपणे होतो. त्यामुळे रिक्त जागांच्या ठिकाणी तासिका तत्त्वावर प्राध्यापक नेमून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात शासनाद्वारे मान्य करण्यात आलेली आहे.
नंतरच्या काळात विविध कारणांनी प्राध्यापक भरती न झाल्याने, अनेक महाविद्यालयांत नियमित प्राध्यापकांपेक्षा तासिका तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक जास्त संख्येने दिसतात. आठवड्याचे फक्त सहा तास त्यांना काम देण्यात येते व जवळपास महिना अखेर उच्चशिक्षित डॉक्टरेट झालेल्या पण तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना रुपये दहा हजारांच्या आत मानधन मिळते. तेही वर्षाअखेर नऊ महिन्यांच्या सत्रातील सहा महिन्यांचेच वेतन काढले जाते.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना पूर्णवेळ प्राध्यापकांच्या दहा टक्के पण मानधन मिळत नाही. १४ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार महिन्याला मानधन देण्याचे निर्देश असतानाही शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत दिले जात नाही. विद्यार्थ्यांचे सातत्याने अंतर्गत मूल्यमापन करण्याचे कार्य, पेपर काढणं, तपासणे आदी कामे पूर्णवेळ प्राध्यापकांप्रमाणेच करावे लागतात, त्याचेही मानधन दिले जात नाही. तेच काम करणाऱ्या नियमित प्राध्यापकांना लाखात पगार भेटतो. उच्चशिक्षितांचे हे शोषण पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळे तासिका तत्त्व तत्काळ बंद करून शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी.
- प्रा. डॉ.परमेश्वर पौळ, राज्य समन्वयक (नेट-सेट पीएचडीधारक संघर्ष समिती)
अनेक वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक भरती बंद आहे. महाराष्ट्र सरकारचे हे उच्चशिक्षणाविषयीचे धोरण अत्यंत चुकीचे आहे. एकीकडे आपण भारत महासत्ता होण्यासाठी धडपडतो आहोत आणि राष्ट्राला महासत्ता करण्यासाठी शिक्षण आवश्यक असताना त्या क्षेत्रात मात्र सावळा गोंधळ चालू आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊन नोकरी करण्याचे आणि कुटुंबाची जबाबदारी पेलण्याचे स्वप्न पाहत आहेत; पण तासिका धोरणाने हे स्वप्नच राहील असे वाटते. परिणामी शेतकऱ्यांप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या आत्महत्या होतील. त्यामुळे तासिका धोरण बंद करून सहायक प्राध्यापकांची भरती करावी.
- प्रा. डॉ. जीवन चव्हाण, गोदावरी मानार महाविद्यालय, शंकरनगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.