संचमान्यतेनंतर शिक्षकांच्या बदल्या! आंतरजिल्हा बदल्यातून स्वजिल्ह्यात जाण्याचीही संधी; आधी समायोजन मग रिक्त पदांची बिंदुनामावली; ३१ मे पूर्वी बदल्यांचे नियोजन
तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर मध्येच होतात. बदलीनंतर शिक्षकांना त्या शाळांमध्ये रुजू होण्यासाठी काही दिवस लागतात. शिक्षक मधूनच बदलून गेल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही होतो. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या बदल्या ३१ मे पूर्वी होणार आहेत. तत्पूर्वी, संचमान्यतेनुसार रिक्त, अतिरिक्त पदांवर शिक्षकांच्या नेमणुका होतील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या पदांची बिंदुनामावली निश्चित होऊन पहिल्यांदा जिल्हांतर्गत बदल्या होणार आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. त्याअंतर्गत साडेआठ हजारांवर शिक्षक कार्यरत आहेत. पण, यंदा पटसंख्या घटल्याने काही शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. आता संचमान्यता झाल्यावर त्या अतिरिक्त शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर रिक्त झालेल्या पदांची जातसंवर्गनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. बदलीपात्र शिक्षकांकडून त्यांची पसंती घेऊन बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याच दरम्यान, २० ते २५ वर्षांपासून स्वत:च्या जिल्ह्यात बदली करून जाण्यास इच्छुक शिक्षकांना देखील आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण, राज्यात जूनपूर्वी सुमारे दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. भरतीतील नवे शिक्षक रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांमध्ये भरणे शक्य होणार आहे.
बिंदुनामावलीनंतर बदल्यांची कार्यवाही
संचमान्यता आता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. संचमान्यता अंतिम झाल्यावर रिक्त, अतिरिक्त जागांवर शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा बिंदुनामावलीनुसार भरणे, बदल्यांची कार्यवाही केली जाईल.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
परजिल्ह्यांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक घरदार सोडून परजिल्ह्यांमध्ये नोकरी करत आहेत. आपले वयोवृद्ध, आजारी आई- वडील, कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत. अनेक शिक्षक पती-पत्नी १५-२० वर्षे झाले परजिल्ह्यांत कार्यरत असून, बदलीने पती-पत्नी एकत्रीकरण होणे गरजेचे आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा सातवा टप्पा राबवावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने राज्य शासनाकडे सातत्याने केली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने ६ जानेवारी रोजी ऑनलाइन बैठक घेत आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील दाखविला आहे. पण, यावरील शासनाचा निर्णय व्हायचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

