सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षकांना धास्ती! शिक्षकांना नोकरी वाचविण्यासाठी ६ ‘टीईटी’ देण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना दोन वर्षांत (३१ ऑगस्ट २०२७ पूर्वी) ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार शिक्षकांना न्यायालयाने दिलेली मुदत संपेपर्यंत सहावेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
TET Exam news

TET Exam news

esakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना दोन वर्षांत (३१ ऑगस्ट २०२७ पूर्वी) ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार शिक्षकांना न्यायालयाने दिलेली मुदत संपेपर्यंत सहावेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून २०२६ या वर्षात जून आणि डिसेंबर महिन्यात ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देखील केंद्रीय तथा राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) घेतली जाते. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी ही परीक्षा आवश्यक आहे. शिक्षकांना या परीक्षेचा देखील पर्याय आहे.

आता ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘सीटीईटी’ घेतली जाणार आहे. त्यासाठी सध्या अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिलेल्या मुदतीत शिक्षकांना तीन ‘सीटीईटी’ देण्याची संधी मिळणार आहे. ‘टीईटी’ असो की ‘सीटीईटी’, यापैकी कोणतीही एक परीक्षा शिक्षकांना मुदतीत उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.

दरवर्षी दोन ‘टीईटी’ घेण्याचे नियोजन

दरवर्षी वर्षात एकदाच ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता चाचणी) व्हायची, पण आता जून व डिसेंबर अशा दोनवेळा परीक्षा घेण्याचे आमचे नियोजन आहे; जेणेकरून उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळेल. आता नोव्हेंबरमध्ये ‘टीईटी’ झाली, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर जून २०२६ मध्ये पुढील परीक्षा होईल. १ सप्टेंबर २०२७ पर्यंत तीन ‘टीईटी’ होतील, असेही नियोजन आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

एका ‘टीईटी’साठी किती अवधी लागतो?

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरायला मुदत देणे, अर्जांची पडताळणी, हॉल तिकीट वितरीत, परीक्षा केंद्रांची निश्चिती, परीक्षा घेणे व त्यानंतर दोन पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी, यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागतो. त्यामुळे वर्षातून एकदाच परीक्षा घेतली जायची. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांना मुदतीत परीक्षेची जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून वर्षात दोन परीक्षा घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.

शिक्षकांची ‘टीईटी’ची स्थिती

  • ‘टीईटी’ द्यावी लागणारे शिक्षक

  • १.६२ लाख

  • ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याची मुदत

  • ३१ ऑगस्ट २०२७

  • परीक्षेच्या मिळणाऱ्या संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com