Ujani Water storage: उजनीतील पाणीसाठा उणे ४१ टक्के पार! सीईओ मनीषा आव्हाळेंच्या धाडसी निर्णयामुळे ९४ गांवाचा पाणीप्रश्न मिटणार

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणीसाठा उणे ४१ टक्के पार झाला आहे. धरणात सध्या केवळ ४१.६७ टीएमसीच पाणी असून त्यातही काही प्रमाणात गाळ आहे.
solapur zp CEO
solapur zp CEOpandharpur

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या धाडसी निर्णयामुळे मंगळवेढ्यातील कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस नवसंजीवनी मिळणार आहे. १२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या या योजनेची पाहणी त्यांनी आज (बुधवारी) केली. कासेगावनंतर त्यांनी शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचीही पाहणी केली. कासेगाव योजनेच्या वीजबिलाची कटकट बंद करण्यासाठी सोलारचा पर्याय उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्यासाठी सीईओ मनीषा आव्हाळे यांचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून दुष्काळातील टंचाईच्या झळा कमी होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. या पाहणी दौऱ्यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटोकधोंड, सांगोल्याचे उपअभियंता सुरेश कमळे, उपअभियंता श्री. पांडव, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. लवटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता श्री माने, सहप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गंत येत असलेल्या गावांचे ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.

जलजीवन मिशनच्या कामांना गती देत असतानाच सध्या पाणीटंचाईचा सामना करीत असलेली कासेगाव प्रादेशिक योजना पूर्ववत करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला. ही योजना सोलारवर कशी सुरु राहील, यासंदर्भातही नियोजन करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. राष्ट्रीय महामार्गामुळे कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस काही अडचणी होत्या. वाखरी तळाजवळील पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रयत्नामुळे पाईपलाईन शिफ्टींगचे काम जलदगतीने होईल अशी आशा आहे. कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशममध्ये समाविष्ठ केल्याचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगितले.

शिरभावी उपसा सिंचन योजनेची होणार वेळेत दुरूस्ती

शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर ८२ गावे अवलंबून आहेत. या उपसा सिंचन योजनेत दीड किमी अंतरावरील पाईपलाईनचे काम जिल्हा परिषदेच्या परवानगीसाठी थांबले होते. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी एका दिवसात मान्यता दिली व काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. योजनेतील जॅकवेलची कामे व पंप हाऊस दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण होतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

उजनी धरणातील पाणीसाठा उणे ४१ टक्के पार

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणीसाठा उणे ४१ टक्के पार झाला आहे. धरणात सध्या केवळ ४१.६७ टीएमसीच पाणी असून त्यातही काही प्रमाणात गाळ आहे. आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून साधारणत: सहा टीएमसी पाणी सोडल्यावर पुन्हा जलसंकट गडद होणार आहे. या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करून त्या त्या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सीईओ मनीषा आव्हाळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com