
तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातील साडेनऊ हजार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार जागा उपलब्ध आहेत. मात्र, प्रवेशासाठी १२ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. तब्बल आठ लाख ७३ हजार जागा रिक्त राहणार असल्याने अनुदानित खासगी शाळांमधील अंदाजित दहा हजारांहून अधिक शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त होतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या सहा लाख ७२ हजार, वाणिज्य शाखेच्या साडेपाच लाख आणि विज्ञान शाखेच्या आठ लाख ७० हजार जागा उपलब्ध आहेत. पण, सोलापूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, बीड, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, सांगली, सातारा, धाराशिव, रायगड, नागपूर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमतेपेक्षा १२ ते १४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज कमी आले आहेत.
दुसरीकडे लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा ३० ते ४० हजार अर्ज कमी आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्यातील ५२७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तर प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मे देखील अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे खासगी संस्थाचालक ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करण्याची दबक्या आवाजात मागणी करत असल्याची स्थिती आहे.
गुणवत्ता याद्या अन् वेळापत्रकात बदल
शून्य फेरीची गुणवत्ता यादी ११ जूनला जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांनी १२ ते १४ जूनदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे. १० जूनला प्रसिद्ध होणारी पहिली गुणवत्ता यादी (कॅप राउंड) सुधारित वेळापत्रकानुसार २६ जूनला जाहीर होईल. १७ जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळा आणि प्रवेशाचे परीक्षण होणार आहे. पहिल्या यादीनंतर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कॅप राउंडअंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी ५ जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होतील.
अजूनही प्रवेशासाठी करता येईल अर्ज
यंदा प्रथमच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली. त्यात ५ जूनच्या मुदतीत १२ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, त्यापैकी १२ लाख पाच हजारांपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. प्रवेशाच्या जागा २१ लाख २३ हजार आहेत, पण अर्ज त्या प्रमाणात आले नाहीत. विद्यार्थ्यांना अजूनही प्रत्येक गुणवत्ता यादीनंतर पुढील प्रवेश फेरीपूर्वी अर्ज करता येणार आहे.
- श्रीराम पानझडे, प्रभारी शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे
अकरावी प्रवेश प्रक्रियेची सद्य:स्थिती
कनिष्ठ महाविद्यालये
९,३४२
एकूण प्रवेश क्षमता
२१.२३ लाख
प्रवेशासाठी प्राप्त अर्ज
१२.०५ लाख
रिक्त जागा
८.७३ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.