Union Cabinet : पटेलांसाठी तटकरेंच्या मंत्रिपदाचा बळी?

मंत्रिपद न मिळाल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी.
prafull patel and sunil tatkare
prafull patel and sunil tatkaresakal

- पांडुरंग म्हस्के

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान न मिळाल्याबद्दल वर्धापनदिनीच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी सुनील तटकरे यांच्या मंत्रिपदाचा बळी दिल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने मंत्रिपदाची संधी गमावल्याने त्याचा फटकाही बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचे नाव मंत्रिपदासाठी सुचवले जाणे स्वाभाविक होते. परंतु लोकसभेतील यश अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे पक्षाला कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद मिळणार होते. यापूर्वी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद भूषविलेल्या प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रिपद स्वीकारणे मान्य नव्हते.

अशावेळी सुनील तटकरे यांचे नाव देऊन त्यांना स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद स्वीकारणे शक्य होते. पटेल यांच्यासाठी नेतृत्वाने पक्षाला मिळालेले मंत्रिपद नाकारले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सुनील तटकरे हे लोकांमधून निवडून आलेले खासदार होते आणि त्यांना मंत्रिपद मिळाले असते तर प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक झाले असते.

अजित पवार यांना बारामतीमध्ये पराभवाचा सामना करावा लागत असताना तटकरे यांनी रायगडची जागा जिंकून पक्षाला मोठ्या नामुष्कीपासून वाचवले होते. त्यांना मंत्रिपद मिळणे सयुक्तिक ठरले असते, परंतु त्यांना नाहीतर कुणालाच नाही, अशी भूमिका पक्षाने कशी काय घेतली? याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मंत्रिपद मिळाले असते तर विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगला फायदा झाला असता, असे कार्यकर्त्यांना वाटते.

खासदारांची संख्या चार होणार

‘‘संसदेत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या चार होणार असल्याने आम्हाला एक मंत्रिपद मिळावे, ही विनंती भाजपने मान्य केली आहे. त्यामुळे आपल्या एका सदस्याला संधी देण्यात येणार आहे,’’ असे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले. आम्ही नाराज नाही, तसेच थांबवण्यासाठी तयार आहोत, असेही पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेल आणि खासदार उदयन राजे यांच्यामुळे रिक्त होणारी राज्यसभेची जागा अशा राज्यसभेच्या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत.

सुनील तटकरे किंवा मी असे काहीही पक्षात ठरविण्यात आलेले नाही. माझ्या नावाचा निर्णय हा पक्षात एकमताने घेण्यात आला होता. त्यामुळे हा वादाचा विषय नाही.

- प्रफुल्ल पटेल, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

महायुतीतील खदखद उघड

मंत्रिमंडळात समाधानकारक जागा न मिळाल्याने महायुतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज जाहीर मागण्या करताच, ‘सहकाऱ्यांनी जे बोलायचे ते बैठकात बोलावे’ असे भाजपने सांगितले आहे. ‘सात खासदार निवडून आले असतानाही केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद न देणे हा अन्याय आहे, असे जाहीर वक्तव्य शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल पाटील यांनी ८० जागांवर आम्ही लढू असे जाहीर केला.

बारणे यांच्या विधानावर पत्रकारांशी बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य आहे असे मला वाटत नाही. जर बारणे प्रतापराव जाधव यांच्याजागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांचे आले असते.

परंतु आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप, नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून हे वक्तव्य आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या जागांबाबतच्या विधानावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘अनिल पाटील यांनी अशी वक्तव्य करणे योग्य वाटत नाही. महायुतीत वितुष्ट निर्माण होईल असे कुणी वक्तव्य करू नये अशा सूचना दिल्या पाहिजेत.

छगन भुजबळ, अनिल पाटील म्हणाले त्याप्रमाणे ४० जागांच्या पक्षाला ८० जागा दिल्या तर उद्या शिंदे यांच्या पक्षालाही ८०-९० जागा द्याव्या लागणार. हे सूत्र लावले तर आमच्या १०५ जागा आहेत. मग आम्हाला २१० जागा द्याव्या लागतील. ३७० चे विधिमंडळ नाही २८८ जागा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com