विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १३ जूनपासून! परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या कमी; सुटीतही विद्यार्थ्यांना फोटो कॉपीसाठी मारावे लागणार हेलपाटे

सध्या सुरू असलेल्या परीक्षा ३० मेपर्यंत चालणार आहेत. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा ९ मेपासून सुरू होतील, त्यात अभियांत्रिकीच्या परीक्षा १३ मेपासून सुरू होऊन मेअखेरीस संपणार आहे.
exam student
exam studentsakal

सोलापूर : २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळा सुटीत देखील निकालाच्या (फोटोकॉपी, निकालातील त्रुटी) अनुषंगाने विद्यापीठात किंवा महाविद्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार आहेत. सध्या सुरू असलेल्या परीक्षा ३० मेपर्यंत चालणार आहेत. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा ९ मेपासून सुरू होतील, त्यात अभियांत्रिकीच्या परीक्षा १३ मेपासून सुरू होऊन मेअखेरीस संपणार आहे.

कोरोनापासून विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक अजूनही रूळावर आलेले नाही. दोन सत्र परीक्षांमध्ये किमान ९० दिवसांचे अंतर अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या परीक्षेचे नियोजन दोनवेळा बदलावे लागले. आता साधारणत: उच्च महाविद्यालयांना ३० मेनंतरच सुट्या लागतील अशी सद्य:स्थिती आहे. त्यानंतर लगेचच १३ जूनपासून विद्यापीठाचे सत्र सुरू होणार आहे. परीक्षा विलंबाने सुरू झाल्याने निकाल मेअखेरीस व जूनमध्ये जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांना फोटोकॉपी व उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी त्या सुट्यामध्येच अर्ज करावा लागणार आहे. आता हा गोंधळ आगामी शैक्षणिक वर्षात तरी सुधारेल अशी विद्यापीठ संकुलासह संलग्नित १०८ महाविद्यालयांमधील ६८ ते ७० हजार विद्यार्थ्यांना आहे.

निवडणुकीमुळे ६ ते ८ मे रोजी पेपरला सुट्या

जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर गॅट, सेट परीक्षा देखील आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ६ ते ८ मे या काळात सुटी असणार आहे. दरम्यान, परीक्षा विलंबाने सुरू झाल्या असल्या तरीदेखील रविवारी पेपर घेण्यात येत नाही. प्रत्येक पेपरसाठी विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुटी दिली जात आहे. दररोज तीन सत्रात परीक्षा होत आहे. पण, निवडणुकीच्या प्रशिक्षणामुळे मागील आठवड्यात विद्यापीठाला मनुष्यबळाअभावी दोन पेपर पुढे ढकलावे लागले. त्यामुळे देखील उन्हाळा सुट्यांवर परिणाम होणार आहे.

ठळक बाबी...

  • - निकालानंतर पहिल्या दहा दिवसांत फोटोकॉपीसाठी अर्ज करणे बंधनकारक; त्यानंतर विद्यार्थ्याने पुढील सात दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक.

  • - शेवटचा पेपर संपल्यानंतर ३० ते ४५ दिवसांत निकाल लावण्याचा नियम; यंदा पहिल्यांदा प्रथम (अभियांत्रिकी) व अंतिम (सर्वच अभ्यासक्रम) वर्षांचे निकाल लावण्याचे नियोजन

  • - पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा ९ मेपासून सुरू होणार असून अभियांत्रिकीची परीक्षा १३ मेपासून सुरू होईल आणि मेअखेरीस संपणार आहे. परीक्षा संपल्यानंतर प्रत्येक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी

  • - ५ एप्रिलपासून परीक्षा सुरू झाली असून ज्यांची परीक्षा संपेल त्यांना त्या दिवसापासून उन्हाळा सुटी, आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात १३ जूनपासून करण्याचे विद्यापीठाचे नियोजन

  • एकूण संलग्नित महाविद्यालये

  • १०८

  • एकूण परीक्षार्थी विद्यार्थी

  • ६८ ते ७०,०००

  • परीक्षेचा कालावधी

  • ५ एप्रिल ते ३० मे

  • एकूण कोर्सेस

  • १४४

आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपूर्वी

सध्या सुरू असलेली सत्र परीक्षा मेअखेरीस संपणार असून त्यानंतर कमीत कमी कालावधीत निकाल जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपूर्वी सुरू होईल.

- डॉ. श्रीकांत अंधारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com