बालविवाह रोखण्याची जबाबदारी आता गावकऱ्यांवर! जिल्हा परिषदेच्या सीईओंचे आदेश; प्रत्येक गावात आज विशेष ग्रामसभा

महिला व बालविकास विभागाच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ या मोहिमेचा शुभारंभ उद्या (बुधवारी) होणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून त्यात बालविवाह प्रतिबंधसंबंधीचा ठराव करायचा आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य, अधिकाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांना बालविवाह होवू देणार नाही म्हणून प्रतिज्ञा घ्यावी लागणार आहे.
child Marriage
child MarriageSakal
Updated on

सोलापूर : महिला व बालविकास विभागाच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ या मोहिमेचा शुभारंभ उद्या (बुधवारी) होणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून त्यात बालविवाह प्रतिबंधसंबंधीचा ठराव करायचा आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य, अधिकाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांना बालविवाह होवू देणार नाही म्हणून प्रतिज्ञा घ्यावी लागणार आहे. बालविवाह रोखण्यासाठी आता गावकऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

राज्यात दरवर्षी दीड ते दोन हजारांहून अधिक बालविवाह रोखले जातात. याशिवाय गुपचूप होणाऱ्या बालविवाहांची संख्याही लक्षणीय आहे. बालवयात मुलीचा विवाह होतोय, याची माहिती असताना देखील अनेकजण गावातल्या गावात वैर नको म्हणून सर्वजण तोंडावर बोट ठेवतात अशी वस्तुस्थिती आहे. अल्पवयीन विवाहिता गर्भवती झाल्यावर दवाखान्यात देखील त्याची माहिती दडवली जाते. ग्रामपंचायतीत विवाह नोंद करताना खोटी जन्मतारीख सांगितली जाते, असेही बोलले जाते. या बाबींना आता आळा बसणार असून त्यासाठी केंद्राच्या महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याच्या महिला व बालविकास विभागावर असणार आहे.

गावात कोणाच्याही मुलीचा १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावला जात असल्यास त्याची माहिती गावकऱ्यांसह ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशासेविकांनी पोलिसांना द्यायची आहे. जेणेकरुन भविष्यात त्या मुलीला कोणत्याही शारीरिक व मानसिक अडचणी येणार नाहीत आणि तिला पूर्ण शिक्षण घेता येईल हा हेतू आहे.

झेडपीच्या सीईओंचे आदेश

‘बालविवाहमुक्त भारत’ कार्यक्रमाबाबत आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात बुधवारी (ता. २७) ग्रामसभा आयोजित करावी. ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंधसंबंधी ठराव करावेत. ग्रामपंचायतीतील निवडून आलेले सर्व प्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या साथीने प्रतिज्ञा घ्यावी. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनाही बालविवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा द्यावी, असे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व तालुका गटविकास अधिकारी, तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

...तर कायद्यानुसार होईल फौजदारी

बालविवाह लावून देणाऱ्यांसह त्या मुलाविरुद्ध व मुलीच्या सासर आणि माहेरच्यांवरही फौजदारी कारवाईची कायद्यात तरतूद आहे. आता केंद्र सरकारच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत बुधवारी (ता. २७) सर्व ग्रामपंचायतींनी गावकऱ्यांना घेवून बालविवाह प्रतिबंधसंबंधीचा ठराव करायचा आहे.

- ईशादीन शेळकंद्दे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com