अमरावती : अमरावती हिंसाराच्या (Amravati Violence) घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी याठिकाणी पत्रकार परिषद देखील घेतली. त्यावर आता मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आक्षेप घेतला आहे. सध्या अमरावती शांत झालेली आहे. याठिकाणी कोणीही राजकीय भाष्य करून अमरावतीकरांना भडकवू नये, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
''आता अमरावती शांत झाले आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीकरांना भडविण्याचं काम करू नये. गृहमंत्री स्वतःपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ज्या लोकांनी भडविण्याचा प्रयत्न केला त्यांना अजिबात सोडले जाणार नाही. दंगल झाली हे सर्वांनी पाहिलं. सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला'', असंही ठाकूर म्हणाल्या.
''मोर्चाला कोणीही परवानगी दिली नव्हती. त्याठिकाणी इंटलिजन्स अयशस्वी झालं होतं. ते का झालं आम्हालाही माहिती नाही. त्यात कोणी अधिकारी दोषी असेल तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू. रझा अकादमी आणि कट्टरपंथीयांचा फायदा कोणाला होत असतो हे सर्वांना माहिती आहे'', असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
''१२ आणि १३ नोव्हेंबर दोन्ही दिवशी झालेल्या घटना या निंदनीय आहेत. दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. फडणवीस हे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांनी माहिती घेऊन बोलायला पाहिजे. त्यांच्या पत्रकार परिषदेतील काही व्यक्तव्य हे आक्षेपार्ह होते. त्यांनी सध्या राजकीय भाष्य करून हिंदू-मुस्लीम असं बोलू नये'', अशी विनंतीही ठाकूर यांनी फडणवीसांना केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.