'दृश्‍यम'मुळे अभिनेत्री म्हणून ओळख 

Bollywood Actress Ishita Duttas Interview
Bollywood Actress Ishita Duttas Interview

मी मूळची जमशेदपूरची. माझं शालेय शिक्षण जमशेदपूरमधील डीबीएमएस इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले. तेव्हापासून मुंबईतच राहतेय. आमच्या कुटुंबात कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हतं. मात्र, माझी बहीण तनुश्री हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यामुळे हळूहळू मलाही अभिनयाची गोडी लागत गेली. शाळेत असताना मी कधीही अभिनय केला नाही वा कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी झाली नाही. मात्र, मला खेळाची आवड होती. व्हॉलिबॉलमध्ये मला विशेष रस होता. मुंबईत आल्यानंतर मला अभिनयात रस वाटू लागला. माझ्या लक्षात आलं, की आपणही अभिनय करू शकतो. त्यासाठी मी अनुपम खेर यांच्या ऍक्‍टिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केला. त्यानंतर मला दक्षिणेमधील जाहिरातींसाठी अनेक संधी आल्या. 

त्याचदरम्यान मी तनुश्रीबरोबर सेटवर जात असे. त्यातून अभिनयातील अनेक पैलू मला समजू लागले. हे करत असतानाच मी दोन-तीन प्रोजेक्‍टमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्याच वेळी आपण आता चित्रपटामध्येच यावं, हे ध्येय निश्‍चित केलं. पदवी घेतल्यानंतर मी त्यासाठी प्रयत्नशील राहिले. तनुश्रीनंच मला प्रोत्साहन दिलं व आताही देत आहे. त्याचबरोबर मला वेळोवेळी मार्गदर्शनही करत आहे. आमच्या कुटुंबात तिच पहिली कलाकार असल्याने सर्वांनाच तिचा अभिमान आहे. खरंतर तिच्यामुळंच मी अभिनय क्षेत्रामध्ये आले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला अभिनयक्षेत्राबाबत काही निर्णय घ्यायचा असेल, तर तिलाच विचारते. 

साऊथमध्ये काम करत असतानाच मला छोट्या पडद्यावर पहिली संधी मिळाली ती 'एक घर बनाऊंगा' या मालिकेत. त्यापूर्वी मी छोट्या पडद्याचा विचारही केला नव्हता. मात्र, संबंधितांनी साऊथमधील माझा एक व्हिडिओ पाहिला आणि मला ऑडिशनसाठी बोलावलं. लगेचच माझी निवड केली. या मालिकेमुळं मी कॅमेऱ्याला सामोरं जाण्याचं कौशल्य शिकले. त्यानंतर मला अजय देवगण यांच्याबरोबर 'दृश्‍यम' या चित्रपटात संधी मिळाली. 'चाणक्‍यडू' या तेलुगू, 'येनिंदू मानासली', 'राजा राजेंद्र' या कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला. 'फिरंगी' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली. त्याचबरोबर "नच बलिए भाग- 6', 'रिश्‍तों का सौदागर- बाजीगर' या मालिकांतही अभिनय केला. करण कापडिया यांच्या आगामी चित्रपटामध्ये मी मुख्य भूमिका साकारणार आहे. 

'दृश्‍यम'मध्ये मी साकारलेली भूमिका मला खूपच आवडली आहे. अजय देवगण यांच्याबरोबर अभिनय करायला मिळाल्याने अनेक गोष्टी शिकता आल्या. यात मी साकारलेली अंजू साळगावकरची भूमिका लोकप्रिय झाली. त्यामुळेच एक अभिनेत्री म्हणून माझी ओळख निर्माण झाली. या चित्रपटाची पटकथा खूपच चांगली होती. अशा चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं, हे माझं भाग्यच आहे. या चित्रपटामुळे मला अनेक गोष्टी शिकता आल्या आणि त्याचा उपयोग मला नेहमीच होईल. त्यामुळे हा चित्रपट आणि त्यातील भूमिका मी कधीही विसरू शकणार नाही. 

माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील एक क्षण खूपच अविस्मरणीय आहे. माझी बहीण तनुश्री 'फेमिना मिस इंडिया स्पर्धेत 2004' मध्ये सहभागी झाली होती. त्या वेळी आम्ही जमशेदपूरमध्ये राहत होतो. मी तेव्हा दहावीत होते. आम्ही सर्व जण टीव्हीसमोर बसलो होतो. स्पर्धेचा एक-एक राउंड होत होता. माझी बहीण पुढची पुढची पायरी चढत होती. त्यामुळं आमची उत्कंठा शिगेला पोचली होती. ती 'मिस इंडिया'चा मुकुट जिंकेल, असं आम्हाला वाटलंही नव्हतं. जेव्हा तनुश्रीच्या नावाची घोषणा झाली आणि तिच्या डोक्‍यावर क्राऊन घातला गेला, तेव्हा आमच्या डोळ्यांमधून अक्षरशः आनंदाश्रू वाहू लागले. तिने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. जमशेदपूरची मुलगी 'मिस इंडिया' झाल्याच्या बातम्या जेव्हा ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवू लागल्या, त्या वेळी जमशेदपूरमध्ये फटाक्‍यांची आतषबाजी झाली. विविध वाहिन्यांचे पत्रकार आमच्या घरी आले, मुलाखती घेऊ लागले. अनेक जण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी पेढे घेऊन घरी गर्दी करून लागले. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. हे क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. 

माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला वळण मिळाले ते मायानगरी मुंबईमुळेच. तनुश्रीबरोबर मी अनेकदा मुंबईत आले होते. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी मी मुंबईत आले, त्या वेळी मला अभिनयाची गोडी लागली. मुंबई म्हणजे एनर्जी देणारं शहर असल्याचं मला जाणवलं. जगात कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, हे मला मुंबईनंच शिकविलं. आयुष्यात काय करायचं, याची दिशाही मला मुंबईनंच दिली. अनुपम खेर अॅक्‍टिंग इन्स्टिट्यूटमध्ये मला अनेक गोष्टी शिकायल्या मिळाल्या. तनुश्रीनेही मला मार्गदर्शन केलं. 

अभिनय क्षेत्रात आल्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. मला स्वतःला आनंद देणाऱ्या क्षेत्रामध्ये मी आहे. जर मी मुंबईत आले नसते, तर कदाचित मी इथपर्यंत पोचले असते की नाही, हे सांगता येत नाही. दरम्यानच्या काळामध्ये माझं लग्न अभिनेता वत्सल शेठ यांच्याबरोबर झालं. त्यांनीही मला तनुश्रीप्रमाणेच खूप मार्गदर्शन केलं आणि आताही करत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com