drishyam 2 review : ‘फॅमिली मॅन’चा जोरदार दणका!

मध्यमवर्गीय, चौथी नापास आणि केबलचा व्यवसाय करणारी, कथा रचण्यात, ती प्रत्यक्षात आणण्यात निष्णात व्यक्ती पोलिसांची पळता भुई थोडी करू शकते याचा अनुभव आपण ‘दृश्‍यम’च्या पहिल्या भागात घेतला होता.
drishyam 2 movie
drishyam 2 moviesakal
Summary

मध्यमवर्गीय, चौथी नापास आणि केबलचा व्यवसाय करणारी, कथा रचण्यात, ती प्रत्यक्षात आणण्यात निष्णात व्यक्ती पोलिसांची पळता भुई थोडी करू शकते याचा अनुभव आपण ‘दृश्‍यम’च्या पहिल्या भागात घेतला होता.

मध्यमवर्गीय, चौथी नापास आणि केबलचा व्यवसाय करणारी, कथा रचण्यात, ती प्रत्यक्षात आणण्यात निष्णात व्यक्ती पोलिसांची पळता भुई थोडी करू शकते याचा अनुभव आपण ‘दृश्‍यम’च्या पहिल्या भागात घेतला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग ‘दृश्‍यम २’मध्ये नायक आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आणखी चाली खेळतो आणि त्याची ही कथा प्रेक्षकांना खिळवून, मंत्रमुग्ध करते. अभिषेक पाठक याचं नेमकं दिग्दर्शन, पटकथा, अभिनय या सर्वच आघाड्यांवर उजवा ठरलेला हा चित्रपट काही त्रुटी असूनही अविस्मरणीय अनुभव देण्यात यशस्वी ठरतो.

‘दृश्‍यम २’ची कथा गोव्यातच सुरू होते व मध्ये सात वर्षं उलटली आहेत. विजय साळगावकर (अजय देवगण) त्याच्या कुटुंबाच्या हातून झालेल्या खुनाच्या खटल्यातून सावरला आहे व त्यानं आपला केबलचा व्यवसाय वाढवला असून, एक सिनेमागृहाचा मालकही झाला आहे. त्याची पत्नी नंदिनी (श्रिया सरन), मुली अंजू (इशिता दत्ता) आणि अनू (मृणाल जाधव) मात्र त्या धक्क्यातून अद्याप सावरलेल्या नाहीत. मृत मुलाची आई मीरा देशमुखनं (तब्बू) खुन्यांना अद्याप माफ केलेलं नाही. पोलिसांनी केस फाइल केलेली असली, तरी या कुटुंबाभोवती एक जाळं विणून ठेवलं आहे.

विजयच्या घराच्या आवारातून प्रेत गायब झालं होतं व ते त्यानं कुठं पुरून ठेवलं आहे हे पोलिसांना (प्रेक्षकांना माहिती होतं!) शोधून काढायचं होतं. त्यासाठी प्रत्यक्ष साक्षीदार शोधण्यासाठी पोलिस धडपडत असतानाच शहरात नवीन पोलिस महासंचालक तरुण अहलावत (अक्षय खन्ना) दाखल होतो आणि तो विजयची फाइल पुन्हा उघडतो. लक्ष्मीकांत गायतोंडे (कमलेश सावंत) हा निलंबित पोलिसही पुन्हा दाखल होतो आणि विजयच्या दिशेनं एक वादळ घोंघावत येतं. त्याचं कुटुंब पुन्हा एकदा या वादळाच्या भक्ष्यस्थानी सापडतं. यातून विजय कसा मार्ग काढतो, खुनाचं प्रकरण (पुन्हा एकदा) दडपण्यात तो यशस्वी होतो का, आपल्या कुटुंबाला वाचवण्यात त्याला यश येतं का याची उत्तर चित्रपटाचं थरारक, खिळवून ठेवणारा शेवट देतो.

चित्रपटाची कथा व पटकथा अतिशय बांधीव असल्यानं ती कुठंही भरकटत नाही. जितू जोसेफ या मूळ मल्याळम कथा लेखक व दिग्दर्शकाला याचे शंभर टक्के गुण आहेत. प्रेताच्या ठिकाणाबद्दलचं गूढ प्रेक्षकांना माहिती असल्यानं आता कथेत नवीन काय असणार याबद्दलची उत्सुकता कायम ठेवण्यात व ती वाढवत नेऊन कळसाध्याय गाठण्यात लेखक-दिग्दर्शकाला यश आलं आहे. (कथेचा शेवट पाहता चित्रपटाचा पुढचा भाग येण्याची शक्यता कमीच दिसते.) परिस्थितीचं थंडपणे विश्‍लेषण करणारा विजय आणि प्रत्येक प्रसंगानं भेदरून जाणारं त्याचं कुटुंब हा चित्रपटभर दिसणारा भाग मनोरंजक झाला आहे. शेवटाकडं जातानाचे ट्विस्ट अत्यंत वेगवान आहेत. (अर्थात, मूळ मल्याळी ‘दृश्‍यम २’ पाहिलेल्यांचा रसभंग होऊ शकतो.) शेवट करण्यासाठी अनेक गोष्टी जुळवून आणल्या असल्या, तरी त्या पटतात.

अजय देवगणचा अभिनय चित्रपटाचा आत्मा आहे. खरंतर, त्यानं अभिनय करण्यापेक्षा चेहरा व डोळे थंड ठेवत विजय उभा केला आहे आणि ते जमून आलं आहे. कोणतीही स्टाइल मारण्याची संधी नसतानाही तो टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतो. श्रिया सरनलाही डोळे आणि चेहऱ्यावरील भाव दाखवत भीती उभी करायची होती व हे काम तिनं छान साकारलं आहे. इशिता दत्ताला संवाद कमी असले, तरीही ती प्रभाव पाडते. अक्षय खन्ना आता टाइपकास्ट झाला असून, त्याचा अभिनय मागील पानावरून पुढं असाच आहे. तब्बूला फारशी संधी नाही. रजत कपूर, सौरभ शुक्ला, कमलेश सावंत, नेहा जोशी यांनी छान साथ दिली आहे.

एकंदरीतच, मनोरंजक ट्विस्ट असलेला फॅमिली मॅन विजयचा हा जोरदार दणका एकदा अनुभवावा असाच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com