Lata Mangeshkar: स्वरविद्यापीठ!

लय, ताल, श्‍वास, शब्दोच्चार, भाव अशा सगळ्याच अंगांचा अभ्यास करण्यासाठी दीदींचं गाणं म्हणजे स्वरविद्यापीठ.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal

परिपूर्ण गायकी म्हणजे लता दीदींचे गाणं. लय, ताल, श्‍वास, शब्दोच्चार, भाव अशा सगळ्याच अंगांचा अभ्यास करण्यासाठी दीदींचं गाणं म्हणजे स्वरविद्यापीठ. इतर कलाकार जिथवर जाऊ शकतात, त्याच्या अनेक योजने पुढे जाऊन त्या बसल्या होत्या. याचे कारण त्यांच्या सुरातील दैवत्त्वात असावे. काही गोष्टी आपल्या आकलनापलीकडच्या असतात. लता दीदींचे सूरही तसेच होते. त्यांच्या सुरात दैवी अंश होता. (Lata Mangeshkar Memories)

राहुल देशपांडे, शास्त्रीय गायक

मी लता दीदींना तीन-चार वेळा भेटलो होतो. त्यांच्या वडिलांच्या, म्हणजे दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लता दीदी आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय पुरस्कार देत असत. त्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या समारंभात मला त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. खूप कमी लोक असे असतात, ज्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर आपल्याला ऊर्जा मिळते. त्या दिवशी लता दीदींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यावर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि अक्षरशः निःशब्द झालो. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.

त्याच कार्यक्रमात नंतर एकदा मी गायलो होतो. त्यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर मला लता दीदींना भेटायला घेऊन गेले. त्यावेळी लता दीदींनी मला शेजारी बसवून घेतलं. त्यांची ऊर्जा, त्यांचं ते वलय इतकं अद्भुत होतं, की मी काहीही बोलू शकलो नाही. त्यांनी माझ्या गाण्याचं कौतुक केलं. माझ्या आजोबांच्या, म्हणजे वसंतराव देशपांडे यांच्या काही आठवणी मला सांगितल्या. तो अर्धा तास माझ्यासाठी अक्षरशः मंतरलेला होता. अगदी अलीकडं आम्ही आत्ता जेव्हा ‘मी वसंतराव’ हा चित्रपट केला, त्या चित्रपटात दीनानाथ मंगेशकर यांच्या दृश्यांसाठी मंगेशकर कुटुंबीयांची परवानगी हवी होती. त्यावेळी मी त्यांना चित्रपटाची ‘सीडी’ पाठवली. दीदींनी तो चित्रपट पाहिला आणि त्यांना तो आवडला. माझ्यासाठी ती फार मोठी पावती होती.

साक्षात सरस्वती!

त्यांच्या गाण्याविषयी काय बोलणार? आपण सगळेच म्हणतो, तसे साक्षात सरस्वती त्यांच्या कंठात वास करत होती. त्यांच्या सुरांमध्ये असलेलं चैतन्य दैवी होतं. पण ते देवत्व असूनही लतादीदी कायम जवळच्या वाटायच्या. जसा विठ्ठल विठू माऊली म्हणून जवळचा वाटतो, तशा लता दीदी आईसारख्या जवळच्या वाटत असत. त्यांच्या सुरांमधील वात्सल्य जवळचे वाटत असे. त्यामुळे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर याहीपेक्षा लता दीदी, लता बाई हेच अधिक आपलेसं वाटतं. लता दीदींनी त्यांच्या गाण्यातून स्पर्श केली नाही, अशी एकही मानवी भावना नसावी. मानवी आयुष्यातील प्रत्येक भावनेचा स्वराविष्कार त्यांनी प्रभावी पद्धतीनं मांडला.

लता दीदींचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा. आयुष्यभर त्यांनी कायम अतिशय साध्या साडीत आणि जोडीला फक्त माईक घेत सादरीकरण केलं. कुठंही दिखाऊपणा करण्याची गरज त्यांना भासली नाही. कारण स्वतःच्या स्वरांवर त्यांचा विश्वास होता. आजच्या परफॉर्मन्सला आणि दिखाऊपणाला महत्त्व आलेल्या जगातही लतादीदी कायम फक्त सुरांमधून व्यक्त होत आल्या. कारण त्यांचा सूर अतिशय चिरंतन आणि दैवी होता. त्यांचा हा सूर आसमंतात चिरकाल घुमत राहील. मात्र, त्यामागील जी जिवंतपणाची ऊब आहे, ती लता दीदींच्या निधनानं हरपली आहे. त्यांच्या सुरांचं सान्निध्य चिरंतन आपल्याबरोबर असेल. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com