
महाघोषणा झाली.. येतोय थरकाप उडवणारा चित्रपट.. 'वीर दौडले सात'
मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर. 'आई','वास्तव' ते 'दे धक्का', 'पु. ल. देशपांडे', 'नटसम्राट' अशा त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने चाहत्यांना वेड लावले. काही चित्रपटांमुळे मोठा गदारोळही झाला. ‘लालबाग परळ’, ‘वरणभात लोन्चा’ यासारख्या चित्रपटांमुळे मोठे वादंग झाले. त्यामुळे महेश मांजरेकर कोणता नवीन चित्रपटघेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष असते. आज महाराष्ट्र दिनी ते एक महत्वाची घोषणा करणार होते. ही घोषणा नसून महाघोषणा असेल असेही ते म्हणाले होते. त्यानुसार ही घोषणा झाली आहे.
महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली होती. ज्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा असलेले एकल पोस्टर होते आणि सोबत एक महाघोषणा करणार असल्याचेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे सकाळपासून चाहते या घोषणेची वाट पाहत होते. अखेर ही महाघोषणा झाली आहे. त्या संदर्भात महेश मांजरेकरांनी एक पोस्ट शेअर करून चित्रपटाचे पोस्टर जाहीर केले आहे. या पोस्टर वर एक भन्नाट कॅप्शन ही त्यांनी लिहिले आहे.
'इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा... मोठ्या पडद्यावर साकारणार... न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम... मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती.. वीर दौडले सात... दिवाळी २०२३..' असे कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे त्यांनी हिंदीतही पोस्टर शेयर केले आहे. 'वो सात' (wo saat) असे हिंदी भाषेतील पोस्टरला नाव देण्यात आला आहे. यावरून हा चित्रपट एकाच वेळी दोन भाषांमध्ये होणार असल्याचे दिसते. शिवाजी महाराजांची गाथा सर्वत्र पोहोचवी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. (veer daudle saat)
येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार असून मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. शिव चारित्रावर होत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये आता महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. या आधीही महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
काय आहे इतिहास?
उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बेहेलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धूमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच "बेहेलोल खान पुन्हा-पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका' अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला. खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्त सळसळू लागले. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणा-या महाराजांचा हुकूम पाळायचा या उेद्शाने मनात अनेक उलट-सुलट विचार करत प्रतापराव गुर्जर फक्त सहा शिलेदारांसह नेसरी खिंडीत शेकडो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बेहेलोल खानाच्या सैन्यांवर तुटून पडले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. मंगळवार 24 फेब्रुवारी 1674 ला सात मर्दांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देवून नेसरी खिंड पावन केली.