कोरोनाविषयक नियम आखून दिल्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र अजूनही कोरोना विषाणूची भीती सर्वांच्याच मनात आहे. लसीकरणाची मोहिम सुरू झाली असली तरी कोरोनाग्रस्तांचा आकडा हा मुंबई आणि महाराष्ट्रात वाढतानाच दिसतोय. अशातच पुन्हा एकदा लॉकडाउन केल्यास चित्रपटसृष्टीच काय तर कोणत्याची क्षेत्राला परवडणारं नाही, अशी पोस्ट मराठी टीव्ही दिग्दर्शक अजय मयेकर यांनी लिहिली आहे. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. 'येत्या काळात प्रत्येकाने नियमांचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. ही स्वत:ची जबाबदारी म्हणून आपण स्वीकारायला हवी. पुन्हा टाळेबंदी लागू झाली तर ते कलाकारांनाच नाही तर कोणत्याही क्षेत्राला परवडणारे नाही,' असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.
काय आहे त्यांची संपूर्ण पोस्ट?
निर्बंध लागू केल्यापासूनच चित्रीकरण युनिटमध्ये वाढ झालेली नाही. शिवाय प्रत्येक आठवड्यात डॉक्टरांची भेट, नियमित तपासणी, दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण यात आजवर कधीही खंड पडलेला नाही. बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चित्रीकरण स्थळी प्रवेश दिला जात नाही. अगदीच काही तातडीचे असेल तर येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण तपासणी होऊनच तो आत येतो. नियम पाळले पाहिजेत याची आठवण का करावी लागते? ते पाळले तरच ही प्रक्रिया अविरत सुरू राहील हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकांना याची जाणीव करून द्यावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे येत्या काळात प्रत्येकाने नियमांचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. ही स्वत:ची जबाबदारी म्हणून आपण स्वीकारायला हवी. पुन्हा टाळेबंदी लागू झाली तर ते कलाकारांनाच नाही तर कोणत्याही क्षेत्राला परवडणारे नाही.
राज्यात कोरोना रुग्णवाढ वेगाने होत असून रविवारी १६,६२० रुग्ण आढळले. तर मुंबईत रविवारी १,९५३ रुग्णनोंद झाली. शनिवारच्या तुलनेत हा आकडा २००ने वाढला. राज्यात आतापर्यंत २३ लाख १४ हजार ४१३ रुग्णांची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५२ हजार ८६१ वर गेली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.