छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. आतापर्यंत या शोचं प्रत्येक पर्व गाजलं असून या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धकदेखील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. अलिकडेच या शोचं १४ वं पर्व पार पडलं. विशेष म्हणजे हे पर्व कोणत्याही टास्कमुळे गाजलं नसून यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधील वादामुळे सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे. राहुल वैद्य, रुबिना दिलैक, अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी, जान कुमार सानू आणि राखी सावंत असे अनेक स्पर्धक त्यांच्यातील वादामुळे चर्चेत राहिले आहेत. यात रुबिना आणि अभिनवसोबत अनेकदा राहुल वैद्यचे खटके उडाले आहेत. त्यामुळेच अलिकडे झालेल्या एका मुलाखतीत त्याला याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, या पश्नांवर राहुलने दिलेलं उत्तर सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आलं आहे.
'बिग बॉस १४' मध्ये सहभागी झालेले राहुल वैद्य, रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला या तिघांमध्ये अनेकदा वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बिग बॉसमधून बाहेर पडल्यावरदेखील तुमच्यातील वाद कायम आहे का असा प्रश्न राहुलला विचारण्यात आला होता. त्यावर राहुलने दिलेलं उत्तर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
"आम्ही सगळे कलाकार आहोत. त्यामुळे कोणतंही काम करण्यास आम्ही कधीच नाही म्हणत नाही. काम करत असताना कधीही मतभेद किंवा अहंकार मध्ये आणता कामा नये. त्यावेळी आम्ही सगळे जण एका कार्यक्रमाचा भाग होतो आणि त्यावेळी जे झालं ते तिथेच संपलं आहे. शो संपल्यानंतर सारं चित्र बदललं आहे. रुबिना -अभिनव या शोनंतरही असेच आनंदात रहावेत हिच माझी इच्छा आहे. त्याचं नातं अधिक दृढ व्हावं असंच मनापासून वाटतं, " असं राहुल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "ते दोघं वेगळे होणार असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं होतं. मात्र, ते विभक्त होऊ नयेत अशीच माझी कायम इच्छा असेल. अनेकदा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर काही जण त्याच विचारात असतात. मात्र, माझं तसं अजिबात नाहीये. आमच्या काही खानदानी वैर नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जे काही झालं ते काही आम्ही कायमस्वरुपी मनात ठेवून चालणार नाही."
दरम्यान, अभिनेत्री रुबिना दिलैक ही 'बिग बॉस १४'ची विजेती ठरली असून राहुल वैद्य फर्स्ट रनर- अप ठरला आहे. मात्र, या शोमध्ये रुबिना आणि राहुलमध्ये अनेक मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा त्यांचे वाद विकोपालादेखील गेले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.