
"लतिकला महान दाखवणं गरजेचं आहे का?"; प्रेक्षकांचा सवाल
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' Sundara Manamadhye Bharali ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. अभिमन्यू आणि लतिका या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली. गेले नऊ महिने प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत होते, ती शर्यत रविवारच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आली. मात्र एपिसोडवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा प्रोमो पोस्ट करण्यात आला. त्यावर प्रेक्षकांनी कमेंट्स करत मालिकेच्या कथेविषयी नाराजी बोलून दाखवली.
मालिकेत काय घडलं?
लतिका बापूंच्या विरोधात जाऊन पत्नी म्हणून अभिमन्यूची पहिल्यांदाच साथ देते. सगळ्यांना अभिमन्यू शर्यतीत हरला असं वाटतं असतानाच लतिका जोखड घेऊन शर्यतीमध्ये भाग घेते. गेल्या नऊ महिन्यांपासून अभिमन्यू या शर्यतीसाठी तयारी करत होता. मात्र शर्यतीत अभिमन्यूचा तोल जाताना ऐनवेळी लतिका जोखड खांद्यावर घेते.
प्रेक्षकांनी का व्यक्त केली नाराजी?
लतिका ज्यापद्धतीने अचानक शर्यतीत सहभागी होते, ते प्रेक्षकांना पटलेलं नाही. 'नात्याची अशी सुरुवात नको होती. शर्यत ही अभिमन्यू आणि दौलत यांच्यामध्ये होती. हिच टशन बघायला गेले अनेक महिने आमच्याकडून संयमाची अपेक्षा ठेवली होती का? अभिमन्यूला कमी दाखवूनच लतिकला महान करणं खरंच गरजेचं आहे का?' असा सवाल एकाने केला. तर शर्यतीचे काही नियम नसतात का, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. 'शर्यतीसाठी अभिमन्यूने नाव दिलं होतं. मग ऐनवेळी लतिका कशी काय शर्यतीत उतरू शकते? शर्यतीचे काही नियम आहेत की नाही', अशा शब्दांत दुसऱ्याने नाराजी व्यक्त केली. 'हेच जर दाखवायचं होतं तर आधीपासून अभिमन्यूला फिटनेस फ्रीक का दाखवलं? तुम्ही लतिकाला महान करताय हे अतिशय चुकीचं आहे', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
शर्यतीच्या भागाबद्दल लतिका (अक्षया नाईक) काय म्हणाली?
“एखादी गोष्ट मिळविण्यासाठी फक्त शारीरिक बळ महत्वाचं नसतं, तर तुमचं मानसिक बळदेखील तितकंच महत्वाच असतं आणि त्याच एका गोष्टीमुळे लतिकाने जिद्द ठेवली. तिने हार मानली नाही आणि शेवटपर्यंत जोखड घेऊन शर्यत लढली. यामधून हे प्रेक्षकांना नक्कीच कळेल अशी मी अशा करते की, आपलं शरीर हे आपलं फक्त वर्णन करतं, परिभाषा सांगत नाही. ही शर्यत लतिकाच्या आयुष्यात खूप महत्वाची ठरणार आहे, कारण आयुष्यभर तिला ज्या गोष्टीसाठी हिणवल गेलं त्यामुळे तिच्यातली 'ती' हरवली गेली. तिने स्वत:चा समज करून घेतला की ती सुंदर नाहीये, ती आयुष्यात काहीच करू शकणार नाही, तिला कोणीच पसंत करणार नाही आणि आता हीच शर्यत सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम लावणार आहे. लतिका अशा मुलींच प्रतिनिधित्व करते ज्यांचं आजवर कोणीच प्रतिनिधित्व केलं नाही. मला असं वाटतं, यशाची पहिली पायरी तिने तेव्हा गाठली जेव्हा तिने स्वत:च्या मताशी ठाम राहून बापूंनी आखून दिलेली लक्ष्मणरेषा पार केली”, अशी प्रतिक्रिया लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईकने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.