
Virajas Kulkarni: चित्रपटासाठी खास दाढी-मिशी वाढवली पण.. 'पावनखिंड'विषयी विराजसने केला मोठा खुलासा
Virajas Kulkarni : 'माझा होशील ना' फेम अभिनेता विराजस कुलकर्णी सध्या बराच चर्चेत आहे. पुण्यातल्या नाट्य चळवळीत सक्रिय असलेला विराज मालिका आणि सिनेमां मध्येही आपल्या कलेची चुणूक दाखवत आहे. नुकताच त्याने दिग्दर्शित केलेला 'व्हिक्टोरिया' हा चित्रपट येऊन गेला.
शिवाय विराज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बराच चर्चेत असतो. त्याने आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी काही महिण्यां पूर्वीच लग्न केले. ते दोघेही चाहत्यांसाठी नेहमीच काहीतरी पोस्ट करत असतात.
पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत विराजसने एक धक्कादायक खुलासा केला आहे. विरजास दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' चित्रपटात काम करणार होता असे तो म्हणाला. पण नेमकं ते का घडलं नाही, हेही त्याने यावेळी सांगितले.
(Virajas Kulkarni reveals he was offered role in pawankhind movie but why he rejected it)
'पावनखिंड' सिनेमा 18 फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट होता. अभिनेता अजय पुरकरने या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.
'पावनखिंड' चित्रपटात अभिनेता विराजस कुलकर्णी यालाही दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक रोल ऑफर केला होता. त्या भूमिकेसाठी विराजसने दाढी मिशीही वाढवायला सुरुवात केली होती. मात्र विराजसनेच ही भूमिका नाकारली. पण ते का? हे त्यानेच आता स्पष्ट केले आहे.
नुकताच विराजस इन्स्टाग्रामवर लाईव्ह आला असताना त्याने सांगितले की, ''मी सुभेदार सिनेमा का करतोय?' हा प्रश्न मला अनेकांनी विचारला. तर यामागे एक किस्सा आहे. तो किस्सा अप्रत्यक्षरित्या 'माझा होशील ना' या मालिकेशी जोडलेला आहे.''
''दिग्पाल लांजेकर मला मी शाळेत असल्यापासून ओळखतात. ते मला शाळेत शिकवायलाही होते. दादाने मला नाटकात काम करायला शिकवलं आहे. मी लहानपणापासून त्याच्यासोबत काम केलं आहे.''
''मी यापूर्वी त्याच्या दोन चित्रपटांचं सबटायटलिंग केलं आहे. त्यामुळे मी शिवराज अष्टकाशी पूर्वीच जोडला गेलो होतो. त्यानंतर अभिनयात पदार्पण केल्यानंतर शिवराज अष्टकातील एका सिनेमात काम करायचं असं मी ठरवलं होतं. पावनखिंड सिनेमात मी कामही करणार होतो. अगदी एका पात्रासाठी मी दाढी, मिशी आणि केसही वाढवले होते.''
''पण नेमकी त्याचवेळी 'माझा होशील ना' या मालिकेसाठी माझी मुख्य भूमिकेत निवड झाली. त्यामुळे मी लगेच दिग्पाल दादाला फोन केला आणि सगळं सांगितलं. मी मालिका करतोय असंही सांगितलं. चित्रपटाच्या तारखांमध्ये गोंधळ होईल असं मी त्याला सांगितलं होतं. म्हणून मी सिनेमात काम करायला नकार दिला. त्यानेही मला मनापासून पाठिंबा दिला.''
''तेव्हापासून त्याच्या चित्रपटात काम करणं राहिलंच होतं. आता इतक्या वर्षांनंतर एकत्र काम करुन खूप धमाल आली. पुन्हा घरी परत आल्यासारखं वाटलं.' सुभेदार' सिनेमात मी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. मी तुम्हाला आवडतो का हे मला पाहायचं आहे.'' असं यावेळी विराजस म्हणाला. त्यामुळे लवकरच विराजस शिवअष्टलातील 'सुभेदार' या चित्रपटात झळकणार असल्याचे निश्चित झाले आहे.